मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला आदित्य ठाकरेंनी मनसे म्हणजे भाजपाची सी टीम असल्याचा उल्लेख केला. त्यांच्या या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना संदीप देशपांडे यांनी, “मला वाटतं की शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे. ज्या पद्धतीने यांचा भ्रष्टाचार चालू आहे, ज्या पद्धतीने विरप्पन गँग महानगरपालिकेमध्ये सक्रीय आहे, आता हजारो कोटी रुपयांचा हिशोब ईडीला द्यायचा आहे. काय केलं, कुठे कुठे पैसे खाल्ले याचा हिशोब ईडी मागत आहे. त्यामुळे ईडीला हिशोब कसा द्यावा, यावर आदित्य ठाकरेंनी लक्ष द्यावं. आमच्याबद्दल बोलण्याची गरज नाही, आमचं काय ते आम्ही बघून घेऊ. तुमच्यावर जी ईडीला हिशोब द्यायची वेळ आली आहे, ते नीट करा तेवढंच पुष्कळ झालं,” अशी टीका संदीप देशपांडेंनी केली.
दरम्यान, आदित्य ठाकरेंनी “आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचं आणि सेवा करण्याचं आहे. मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं आहे. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या टीकेलाच आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.