सोलापूर – सत्तेत सोबत असताना वार कशाला करता, असा सवाल करत शिवसेनेचे माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. सोलापुरात युवा सेनेचा निश्चय मेळावा झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
आमदार सावंत म्हणाले, आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती, शिवसेना विस्थापितांचा गट असून कोणीही आजमावून बघू नये. शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते ते अर्थसंकल्पमध्ये देखील दिसून आले आहे. 65-60 टक्के बजेट राष्ट्रवादीला, 30 ते 35 कॉंग्रेसला, 16 टक्के त्यात ही पगार काढावे लागतात. विकासकामाला केवळ 10 टक्के बजेट. राष्ट्रवादीचे ग्रामपंचायत सदस्यदेखील कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो, आम्हाला केवळ गोड बोलले जात असल्याचे सावंत म्हणाले.
ही सत्ता तुम्ही स्वप्नात तर पाहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली, तुम्ही त्यावरच अन्याय करता आहात असा आरोपही त्यांनी केला. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असे ठरलेले असताना असं का होतं?. आमच्या नादाला लागू नका. तुम्ही शंभर मारले आणि आमचा एकच दणका बसला की आईचे दूध आठवेल, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. यावेळी मागील अडीच वर्षात शिवसैनिकांना फोडल्याचे दाखले देत त्यांनी अन्यायाचा पाढाच वाचला.