नवी दिल्ली – मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत स्वबळावरच सर्व जागा लढवण्याची तयारी शिवसेनेने केली असून आम्ही त्या महापालिकेत किमान शंभर जागा जिंकू असा विश्वास शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पुण्यात स्वबळावर लढणार आहे त्यामुळे आम्हीही मुंबईत स्वबळ अजमावायचे ठरवले आहे असे देसाई यांनी आज येथे पत्रकारांना सांगितले. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर आमची सत्ता असली तरी कालच राष्ट्रवादीने पुण्यात स्वबळावर लढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे त्यामुळे आम्हालाही मुंबईबाबत हाच निर्णय घ्यावा लागत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
तथापि आम्ही गोव्यात मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर लढत आहोत ही बाबही त्यांनी लगेच स्पष्ट केली. मतदार संघांच्या फेररचनेनंतर मुंबईतील वॉर्डांची संख्या आता नऊने वाढली आहे. ती 227 ऐवजी 236 इतकी झाली आहे.
सध्याच्या महापालिकेत शिवसेनेचे 97 नगरसेवक, भाजपचे 83, कॉंग्रेसचे 29 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहा नगरसेवक आहेत. समाजवादी पक्षाचे सहा आणि एमआयएम पक्षाचे दोन आणि मनसेचा एक नगरसेवक मुंबई महापालिकेत आहे.