मुंबई : नरेंद्र मोदी यांच्यामुळेच भाजपला लोकसभेला प्रचंड यश मिळाले असून भाजप-शिवसेना उमेदवारांना अनेक विधानसभा मतदार संघात आघाडी मिळाली आहे. राज्यात देखील या मोदी लाटेवर स्वार होण्याची संधी भाजपकडे आहे. त्यामुळे शिवसेनेला युतीची इच्छा असली तरी भाजप ऐनवेळी स्वबळावर लढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. तशी वक्तव्य आणि इशारेदेखील भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.
2014 मध्ये स्वतंत्र लढून 122 जागांपर्यंत मिळवणाऱ्या भाजपचे आता लोकसभेप्रमाणेच राज्यातही बहुमताचा आकडा पार करण्याचे लक्ष्य आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेसोबत सरकार चालवणे नको असल्याची भावना अनेक भाजप नेत्यांच्या मनात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात 23 जागा मिळाल्या. तर शिवसेनेच्या वाट्याला 18 जागा आल्या. या जागांवरूनच शिवसेना भाजपपेक्षा बरीच मागे असल्याचे दिसून येते. गेल्यावेळी मोठा भाऊ म्हणून युती तोडणारे शिवसेना नेते पाच वर्षांत शिवसेना-भाजप जुळे भाऊ असल्याचे सांगत आहेत. यावरून शिवसेना नेत्यांना देखील भाजपला स्वबळावर बहुमत मिळण्याची भीती आहे, असंच दिसत. तर विधानसभेला विरोधक एकत्र लढले तरी, भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचा इशारा मिळत आहे.