संगमनेर (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना खासदार झाल्यानंतर गती दिली. डिसेंबर अखेरपर्यंत कालव्यांची कामे पूर्ण होणार असून तळेगाव दिघे येथे जलपूजनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केले स्थानबद्ध
शिंदे गटात गेलेले खासदार सदाशिव लोखंडे यांचा संगमनेर दौरा असल्याने शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी आणि उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून संगमनेर पोलीसांनी स्थानबद्ध करत नजर कैदेत ठेवले. यापूर्वी देखिल अमर कतारी व भाऊसाहेब हासे यांनीच शिवसेना सोडणाऱ्या तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेना स्टाईल मारहाण केली होती. त्यामुळे यावेळी काही घडू नये यासाठी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले.
संगमनेर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासंदर्भात खासदार लोखंडे यांनी आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता के. एच. ठाकरे यांच्या दालनात ही बैठक पार पडली. यावेळी रमेश काळे, रविंद्र गिरी, दिनेश फटांगरे यांसह निळवंडे पाटपाणी कृती समितीचे नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, दत्ता भालेराव, शिवाजी शेळके, जालिंदर कांडेकर, अण्णासाहेब वाघे, कानिफ कणसे, बाळासाहेब घोरपडे, विलास गुळवे, सोपान वाघ, मच्छिंद्र वाघ, रावसाहेब चौधरी, नवनाथ कांडेकर, विजय मगर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा लोखंडे म्हणाले की, निळवंडे धरणाच्या कालव्यांचे पाणी डिसेंबर अखेर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येईल. कालव्यांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच घाटमाथ्यावरून वाहून जाणारे आणि समुद्राला मिळणारे पाणी अडविण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित असणारा निळवंडे कालव्यासाठी मी खासदार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांबरोबरच मराठवाड्याला देखील न्याय मिळेल. गोदावरी आणि मुळा नद्यांवर स्टोरेज टॅंक बांधून पाणी अडवून त्यात शेतळऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.