लॉकडाऊन काळात देशाच्या सीमेपर्यंत गेलीच कशी? : पोलिसांना शंका
पुणे – कौटुंबिक भांडणाच्या रागातून एक महिला बाहेर पडली. ती सापडत नाही, हे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. तपासादरम्यान पोलिसांनी तिच्या मोबाइलचे “लोकेशन’ घेतले, तेव्हा ती आसाममध्ये असल्याचे आढळले. 30 वर्षांची महिला लहान मुलाला घेऊन देशाच्या सीमेवरच्या जिल्ह्यात आढळल्याने लॉकडाऊनमध्ये ही महिला इतकी लांब गेलीच कशी, असा प्रश्न पोलिसांना पडला. मात्र, तरी देखील तिचा शोध घेऊन गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने महिलेला पुण्यात सुखरूप आणले आहे.
आसामच्या करीमगंज पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या महिलेला पुण्यात परत आणले. दरम्यान, महिलेने सांगितलेले कारण ऐकून पोलिस सुद्धा हैराण झाले. ती म्हणाली “घरातील भांडणाचा राग आल्याने मी बाहेर पडले होते. राग शांत झाल्यावर घरी परत येणारच होते.’ वारजे येथील ही 30 वर्षाची महिला पुण्यातच राहणारी. ती आणि पतीही नोकरी करतो. घरात भांडण झाले. घरातील कोणी आपले ऐकत नाही हे पाहून ही महिला 3 वर्षांच्या मुलासह घरातून निघून गेली. ती हरवल्याची तक्रार दि. 8 जून रोजी वारजे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
पोलिसांनी या महिलेचा शोध सुरू केला. तेव्हा तिच्या मोबाइलचे लोकेशन करीमगंज सिलचर रोड येथे आढळून आले. पुणे पोलिसांनी तत्काळ करीमगंज पोलिसांना याची माहिती कळविली. तेथील पोलिसांनी या महिलेचा शोध घेऊन मुलासह तिला 14 जूनला ताब्यात घेतले. ही माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस शिपाई भांडवलकर हे तातडीने आसामला गेले. त्यांनी या महिलेला पुण्यात आणले.