नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडीमध्ये आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच नुकसानीची माहिती शरद पवार यांनी पंतप्रधानांना दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी मदत लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणीदेखील यावेळी शरद पवारांनी केली आहे.
शरद पवारांनी पंतप्रधानांना दिलेल्या पात्रात म्हटले आहे की,”यावर्षी अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील 325 तालुक्यांमधील जवळपास 54.22 लाख हेक्टर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. या अभुतपूर्व परिस्थितीची आढावा घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मी 1 नोव्हेंबरला नाशिक जिल्ह्यात आणि 14 नोव्हेंबरला नागपूर विभागात भेटी दिल्या’.
“माझ्या या भेटींमध्ये मी जे अनुभवलं ते अत्यंत वेदनादायक आणि धोक्याची घंटा वाजवणारं आहे. यावर्षी परतीच्या मान्सून पावसाने महाराष्ट्रातील मोठ्या भागात शेतातील जवळपास प्रत्येक पीक उद्ध्वस्त केलं. मी भेट दिलेल्या नाशिक आणि नागपूरमधील इशारा देणाऱ्या परिस्थितीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो”.