नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कोणतेही समीकरण जुळवून आणले तरी सुटताना दिसत नाही. राज्यात रोज पक्षांच्या बैठकांवर जोर देण्यात येत असल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील या सत्तास्थापनेच्या गोंधळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज भेटीला जाणार आहेत. याविषयीची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
संसदेत 12 वाजण्याच्या सुमारास ही भेट होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तापेच अद्यापही सुटला नसून वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे या बैठकीत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात राज्यातील राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणार का याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. शरद पवार शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करावी अशी मागणी करणार आहेत,अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या हातचं पीक गेलं आहे. नाशिक आणि आसपासच्या परिसरातही पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे.
शरद पवार यांनी 15 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतला. झालेल्या नुकसानाची माहिती शरद पवार केंद्र सरकार आणि संबंधित मंत्र्यांना देणार असून लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी अशी मागणी करणार आहेत. दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यावर स्तूतिसुमने उधळली होती त्यातच आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.