जामखेड – निवडणुकीचा निकाल लागेपर्यंतच गट-तट असतात. पण जिंकून आल्यावर सर्वच मतदारसंघातील व्यक्तींचा विकास करण्यासाठी सर्वांना आपण बरोबर घेणार आहोत, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
आमदार पवार यांच्या उपस्थितीत जामखेड येथे बूथ कमिटी आभार बैठक आयोजित केली होती. त्यावेळेस ते बोलत होते.
यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, विजयसिंह गोलेकर, नगरसेवक डिंगाबर चव्हाण, पवन राळेभात, अमित जाधव, प्रकाश काळे, प्रदीप पाटील, सरचिटणीस संजय वराट, ढेपे, युवकचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, सुरेश भोसले, रमेश आजबे, शहाजी राळेभात, चंद्रकांत राळेभात, सुनील लोंढे, सुनील कोठारी, अमोल गिरमे, प्रहारचे राहुल पवार, भीमराव पाटील, प्रशांत राळेभात, गजाजन फुटाणे, जुबेर सय्यद, ग्रा. पं सदस्य शबीर सय्यद, ऍड. हर्षल डोके, अमृत महाराज डुचे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार, मनसे व आघाडीच्या सर्व मित्र पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. पवार म्हणाले, विकासाच्या मुद्यावर सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहोत. त्यामुळे मी कामाला सुरुवात केली आहे. कुकडीच्या पाण्यासाठी मतदारसंघात सर्वेक्षण सुरू असून, ते ही लवकरच पूर्ण होणार आहे. आगामी काही दिवसांत कुकडीचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच शासनाला या सर्वेक्षणाचा अहवाल देणार आहे. पुढील काळात महिला बचतगटांना मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. नागरिकांच्या आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी मोठे काम करायचे आहे.
मतदारसंघात प्रत्येक गावात तक्रार पेटी ठेवणार आहोत. तसेच दर चार महिन्यांनी जनता संवाद कार्यक्रम घेणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.तसेच शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मागील रब्बीचे पैसे मिळाले नाही. त्यासाठी पाठपुरावा करत असून, लवकरच शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळणार आहेत.निवडणुकीत ज्या पोटतिडकीने काम केले. त्यांचा सर्वांचा आभारही त्यांनी मानले. प्रामुख्याने महसूल विभागातील तलाठी, ग्रामसेवक विविध खात्यांचे अधिकारी बदलावेत, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार पवार यांच्याकडे केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात आदींची भाषणे झाली.