मुंबई: राजकारणात राजकीय संघर्ष आपण नेहमी करत असतो. त्यात चुकीचे नाही. त्या गोष्टी चालतच असतात, पण संपूर्ण देशावर आज संकट आले आहे. त्यावेळी एकमेकांच्या विरोधात संघर्ष करण्याची ही स्थिती नाही. त्यामुळे कोण कुठल्या पक्षाचे सरकार आहे किंवा दिल्लीत कुठल्या पक्षाचे राज्य आहे हे आजच्या घडीला महत्त्वाचे नाही. तर आज आपण सगळ्यांनी मिळून करोनाचा पराभव करायचा हे उद्दिष्ट आपल्यापुढे आहे. त्यामुळे त्या दृष्टीने पावले टाकली पाहिजेत, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना दिला आहे.
राज्यातील आणि देशातील जनतेच्या मनात चिंता निर्माण झाल्याने आज चौथ्यांदा शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर झालेल्या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली. काल बांद्रा रेल्वे स्टेशनवर एक दुर्दैवी घटना घडली. कुणीतरी रेल्वे सुटणार आहे अशी अफवा उठवली. त्यामुळे दुर्दैवाने सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना पाळल्या गेल्या नाहीत. त्याठिकाणी पोलीस बळाचा वापर झाला. त्यामुळे लोकांच्या मनात साशंकता निर्माण होईल अशा प्रकारच्या घटना घडू नये, असे शरद पवार यांनी सांगितले.
सध्या देशात नाही तर संपूर्ण जगभरात करोनाची चर्चा आहे. करोनामुळे प्रचंड व्यापक संकट देशावर आले आहे. त्याचा सामना धैर्याने आणि योग्य पद्धतीने नियोजन केले पाहिजे. जागतिक पातळीवर ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी होते. भारत सरकार, राज्य सरकार, संपूर्ण शासकीय यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रातील घटक, डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांचे सहकारी करोनाला पराभूत करण्यासाठी धैर्याने उभे आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. त्यांच्या या भूमिकेला सर्व राज्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जनतेनेही याला सहकार्य करावे. काही कार्यक्रमांची मांडणी केली. त्यांनी जी भूमिका मांडली त्याला पूर्णपणे सहकार्य करण्याची खबरदारी घेतली पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, केंद्र सरकार सीएसआर फंड वापरत आहे. ती रक्कम राज्याच्या मुख्यमंत्री रिलिफ फंडाला उपलब्ध करून दिली पाहिजे आणि पंतप्रधान रिलिफ फंडाला जशी मदत होते तशी मदत मुख्यमंत्री रिलिफ फंडाला उपलब्ध करून दिली तर राज्याला या कामाला मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शेतकरी मोठ्या संकटात
करोनामुळे अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला आहे. शेती असो किंवा शेतीत पिकलेले आहे त्याला आज बाजारपेठ नाही. मुंबईसारखी एपीएमसी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचा उपयोग होईल, पण राज्याचा विचार केला तर आज अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले जे काही असेल त्याला मार्केट नाही. त्यामुळे हातातील पीक सोडून देण्याची खबरदारी दुर्दैवाने घ्यावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. उद्योग बंद आहेत त्याचाही परिणाम मोठा झाला आहे. बॅंकेचे व्याज वाढतेय, कामगारांचा पगार वाढतोय, उत्पन्न नाही. त्याशिवाय आणखी एक संकट पुढे आले आहे ते म्हणजे बेकारी, बेरोजगारी. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढेल अशाप्रकारचे चिन्ह दिसतेय, अशी भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.