सांगोला – अजित पवार माझा पुतण्या आहे. पवार कुटुंब जर बघितले तर मी आता कुटुंबात वडिलधारी आहे. त्यामुळे वडीलकीच्या नात्याने मी अजित पवारांना भेटलो, तर ही माध्यमांची किंवा वर्तमानपत्रातील चर्चा होऊ शकत नाही. या भेटीने माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही. भाजपची विचारधारा राष्ट्रवादीच्या अर्थात आमच्या चौकटीत बसत नाही, असे परखड मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.
या भूमिकेद्वारे त्यांनी शनिवारी अजित पवारांसोबत झालेल्या गुप्त बैठकीच्या चर्चेवर पडदा टाकला. शरद पवार म्हणाले, भाजपबरोबर युती करणे, हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय धोरणामध्ये बसत नाही. त्यामुळे आम्ही कुणीही भाजपबरोबर जाणार नाही. आमच्यातील काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्यात काही परिवर्तन होईल का? असा प्रयत्न आमचे काही हितचिंतक करत आहेत. त्यासाठी ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी भूमिका मांडतो की, राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपबरोबर जाणार नाही.
“इंडिया’ची मुंबईत बैठक
31 ऑगस्टला मुंबईमध्ये प्राथमिक अजेंडा ठरवण्याची बैठक आहे. 1 सप्टेंबरला देशातील 40 पक्षाचे नेते एकत्र येणार आहेत. त्यावर निर्णय होणार आहे. या बैठकीत काही मुद्दे घेऊन भविष्यातील निर्णय घेतली जाणार आहे. मी स्वतः राष्ट्रवादी म्हणून, उद्धव ठाकरे शिवसेना आणि कॉंग्रेस नेते नाना पटोले आम्ही सर्वांनी मिळून ही बैठक आयोजित केली आहे. यात देशातील सर्व विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत, असेही पवारांनी यावेळी म्हटले.
त्यांच्यासोबत गेलेले लोक दु:खी
अजित पवारांसोबत गेलेले काही लोक दु:खी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक परत येऊ इच्छितात. आमच्याकडून जे झाले ते चुकीचे झाले. चूक सुधारून घ्या, असे सर्वजण म्हणत आहेत. काही उघडपणे असे म्हणत नाहीत. पण त्यांच्यातील दु:ख माझ्यापर्यंत आलेले आहे. 2024 पर्यंत काही बदल होईल, असेही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले. यासह, काल झालेली अजित आणि माझी बैठक ही अजिबात गुप्त बैठक नव्हती. परंतू माध्यमांनी त्यावर विनाकारण चर्चा केली. याचा अर्थ तुम्हाला काही कामे नाहीत, असे सांगून त्यांनी माध्यम प्रतिनिधींना टोला लगावला.
नोटीशींना तोंड देण्यास सक्षम
जयंत पाटलांच्या बंधूला आलेल्या ईडी नोटीस संदर्भात पवार म्हणाले की, आजची राजकीय परिस्थिती विचित्र झालेली आहे. विरोधकांवर दबाव आणण्यासाठी सत्ताधारी ईडी, सीबीआय यांच्या नोटीस पाठवत आहेत. परंतु, अशा नोटीशींना तोंड देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तसेच, राहुल गांधी पुन्हा खासदार झाले. त्यामुळे पंतप्रधान पदासाठी इंडियामध्ये वादविवाद होतील का? अशा प्रश्नाला “पदासाठी अजिबात वाद होणार नाही. आज सद्यस्थितीत ज्यांच्या हाती सत्ता आहे. त्यांच्याकडून ते काढून घेणे जास्त गरजेचे आहे,
असे ते म्हणाले.