मुंबई – दोन महिन्यांपूर्वीची अजित पवार यांची भाषणे काढून पाहा. तिकडे गेल्यावर आणि लाल गाडीच्या दिव्यात बसल्यावर भाषा बदलली आहे. पहिले पन्नास खोके होते, आता 100 खोके झाले आहेत. अजितदादांना दुसऱ्यांना प्रमाणपत्र देण्याची मानसिकता राहिलेली नाही, असा टोला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. पटोले यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस भवनमध्ये विरोधकांच्या “इंडिया’ आघाडीची बैठक झाली. त्यानंतर पटोले यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. शरद पवार, अजित पवार यांच्या कथित भेटीबाबत विचारले असता त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
नाना पटोले म्हणाले, मित्रपक्षांत काय सुरू आहे, तिथे काय घडते आहे, हा त्यांचा अतंर्गत प्रश्न आहे. मित्रपक्ष असला तरीही त्यांच्याकडे अशा गोष्टींवरून लक्ष देण्याची गरज नाही. शरद पवार नक्कीच इंडिया आघाडीबरोबर राहतील, याचा विश्वास आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत आघाडीच्या वतीने राज्यातील जनतेमध्ये महागाई, बेरोजगारी याबरोबरच केंद्र सरकार, भाजप कसे सामाजिक वातावरण खराब करीत आहे, याविषयी जागृती निर्माण करण्यात येईल,’ असे पटोले यांनी सांगितले.
केंद्र सरकारने आयपीसी कायद्यात अनेक बदल केले आहेत. काही कायद्यात दुरुस्त्या केल्या आहेत. काही नवे कायदे निर्माण केले आहेत. तर काही जुने कायदे रद्द केले आहेत. देशद्रोहाचा कायदाही रद्द करण्यात आला आहे. आताच देशद्रोहाचा कायदा रद्द का करण्यात आला? आताच कायदा रद्द करण्याचे कारण काय? कुरुलकर हे संघाशी संबंधित आहेत. त्यांना वाचवण्यासाठी हे विधेयक आणले का? असा सवाल पटोलेंनी केला आहे.
राहुल गांधींचा मातोश्री दौरा निश्चित नाही
पटोलेंना यावेळी राहुल गांधी मातोश्रीवर जाणार आहेत काय? असा सवाल करण्यात आला. त्यावर पटोले यांनी, राहुल गांधी हे मातोश्रीवर जाण्याचा असा काही कार्यक्रम ठरलेला नाही, असे स्पष्ट केले. कॉंग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्याने राहुल गांधी हे मातोश्रीवर जाण्याच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.