Sharad Pawar on Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीपातीचे राजकारण सुरु झाले असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी लगावला होता. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिल आहे. ते कोल्हापूर येथे बोलत होते.
राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी, “बरेच महिने हे कुठे भूमिगत झाले होते, याचा काही कुणाला अंदाज येत नव्हता. त्यांचं हेच वैशिष्ट आहे की, दोन-चार महिने कुठेही भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन-चार महिने काय करतात मला माहीत नाही.” अशी मिश्किल टिपणी केली.
सर्व जाती-जमातीच्या लोकांना घेऊन पुढे जाणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांनी मागील पाच -सात वर्षांचा त्यांनी उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व राज्यात कोण कोण करत होतं? महाराष्ट्राची विधानपरिषदेत पहिल्यांदा छगन भुजबळ नेते होते. त्यानंतर मधुकरराव पिचड हे नेते होते. भुजबळ कोणत्या समाजाचे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. अशी सर्वांची जर यादी बघितली, तर यावेळी पहिल्यांदा अजित पवारांची निवड झाली आणि त्याचं कारण, सभासदांनी असं सांगितलं की त्यांना विधीमंडळात येऊन ३० वर्षे झाली आणि एवढा काळ एखादी व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असताना, त्यांना संधी द्यावी. त्यातून ही निवड झाली. सर्व जाती-जमातीच्या लोकांना घेऊन पुढे जाणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.” असं देखील शरद पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
आपल्या भाषणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला लक्ष्य करताना ते म्हणाले की, जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलेलो आपण हिंदू म्हणून कधी एकत्र येणार. जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचे राजकारण वाढले. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवले. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार. आपण जर जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलो असतील, तर कोणते हिंदू आणि हिंदुत्व घेऊन बसता. राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी यावेळी केला.