राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत निर्णय
मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना सर्वाधिकार देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी दिली. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्तास्थापन करणे अशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. बैठकीला शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मलिक यांनी महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी पवारांना अधिकार दिल्याची माहिती दिली.
तसेच चर्चा करून निर्णय घेण्यासाठी प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबव, सुनील तटकरे अशा ज्येष्ठ नेत्यांची समिती गठीत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आजच्या बैठकीला पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. राज्यात तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा असेल तो कॉंग्रेसशी बोलूनच होईल, असेही मलिक म्हणाले.