पंढरपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेतले आहे. यानंतर त्यांनी सरकोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात हजेरी लावली. यादरम्यान, भगीरथ भालके यांनी बीआरएस म्हणजे भारत राष्ट्र समितीमध्ये होणार जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमाला तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव स्वत: आले होते. तसेच तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला आलं होतं. तेलंगणाहून जवळपास 500 ते 600 गाड्यांचा ताफा या कार्यक्रमाला आला होता. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं.
या पक्ष प्रवेशावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले,’एखादी व्यक्ती गेली तर फार चिंता करायची गरज नसते. भगीरथ भालके यांना आम्ही ज्या वेळेला विधानसभेला संधी दिली त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं होतं की, आमची ही निवड चुकीची होती. त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी दिली.
दरम्यान, सभेच्या आधी दिवंगत आमदार भारत भालके यांच्या समाधीचे केसीआर दर्शन घेऊन अभिवादन केले. अभिजीत पाटील यांनी पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी तर्फे विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याचे संकेत पवारांनी दिले होते. तेव्हापासून भगीरथ भालके नाराज होते.