गोष्ट सांगत घेतला मोदी-शिंदेंचा समाचार; प्रकल्प महाराष्ट्रात येणे अशक्य
पुणे – फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजरातला नेणाऱ्या वेदांत समूहाच्या यापूर्वीच्या राज्यातील अनुभवाचा फुगा फोडतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लहान मुलाच्या फुग्याची गोष्ट सांगत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा समाचार घेतला. हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येणे शक्य नाही. त्यामुळे जे घडले, त्यावर चर्चा न करता, नवे काही करता येईल का, यावर चर्चा करावी, असा सल्ला पवार यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही दिला.
फॉक्सकॉन हा प्रकल्प तळेगावला होणार होता. राज्य शासनाने त्याबाबत आवश्यक त्या निर्णयाची तयारीही ठेवली होती. मात्र त्यात बदल झाला. हा प्रकल्प गुजरातला गेला. हा निर्णय बदलावा, असे काही लोकांनी सांगितले असले तरी त्यात आता बदल होणार नाही, असेच वाटते आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारची जागा एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतली आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध पेटले आहे. महाविकास आघाडी सरकारने काही निर्णय घेतला नाही, अशी टीका केली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सांमत हे दोघेही मंत्रिमंडळात होते.
या दोघांनीही आधीच्या सरकारने दुर्लक्ष केल्यानेच प्रकल्प गुजरातला गेला, असे म्हणणे शहाणपणाचे लक्षण नाही. तत्कालीन उध्दव ठाकरे सरकारवर खापर फोडणे योग्य नाही, असे पवार यांनी सांगितले. सत्ताधारी व विरोधकांनी आता आरोप-प्रत्यारोप थांबविले पाहिजेत. नवीन प्रकल्प महाराष्ट्रात यावेत, याकडे सर्वांनीच लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला पवार यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना दिला. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यावर मोदी यांनी महाराष्ट्राला फॉक्सकॉनपेक्षाही मोठा प्रकल्प देऊ, असे आश्वासन दिले आहे. याचा पवार यांनी समाचार घेतला.
घरात एका लहान मुलाला फुगा दिल्यानंतर दुसरा मुलगा रडतो. त्यावेळी मोठा फुगा देतो, असे वडिल सांगतात. ही लहान मुलांची फुग्याची गोष्ट पवार यांनी सांगितली. मोदींनी महाराष्ट्राला प्रकल्प दिल्यास त्याचे स्वागतच करण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. केंद्राची सत्ता हातात असताना त्याचा परिणाम काही ठरावीक राज्यांना होत असतो. त्यादृष्टीने मोदी यांचे दौरेही ठरावीक ठिकाणीच होतात, असे पवार म्हणाले.
चांगल्या कंपन्या महाराष्ट्रात यायला हव्यात
कोणालाही गुंतवणूक करायची झाली की देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य हे महाराष्ट्र असायचे. महाराष्ट्रातील सोयी-सुविधांमुळेच हा फायदा व्हायचा. चाकण-तळेगाव-रांजणगाव हा ऑटोमोबाईच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. त्यामुळे देशातल्या चांगल्या कंपन्या महाराष्ट्रात आल्या पाहिजेत. कंपन्यांची भांडवली गुंतवणूकही वाढली पाहिजे. या अनुषंगाने योग्य वातावरण निर्माण झाले पाहिजे. यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी वाद बंद करून विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले
हे काही नवीन नाही…
वेदांत समूहाने फॉक्सकॉनचा प्रकल्प तळेगावऐवजी गुजरातला उभारण्याचा निर्णय घेतला. प्रकल्प कुठे उभारायचा, याचा अधिकार वेदांत समूहाला आहे. मात्र यापूर्वीही त्यांनी असाच प्रकार केला आहे. रत्नागिरी येथे एक मोठा प्रकल्प त्यांच्याकडून उभारण्यात येणार होता. मात्र स्थानिकांनी विरोध केल्यामुळे तो प्रकल्प चेन्नईला हलविण्यात आला. यामुळे वेदांत समूहाने पहिल्यांदाच प्रकल्प बाहेरच्या ठिकाणी हलविला हे काही नवे नाही. त्यामुळे वेदांतचा प्रकल्प शेवटपर्यंत येईल का, याची खात्री देता येणार नाही, असे पवार यांनी सांगितले.