पिंपरी -करोनाच्या जागतिक महामारीने कोट्यवधी लोकांना बाधित केले होते. दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. करोनापासून जीव वाचविण्यासाठी स्टेरोईड, रेमिडेसिवीर आणि इतर औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. या औषधांनी त्यावेळी जीव वाचूवन करोनामुक्त तर केले परंतु आता त्या औषधांचे साइड इफेक्ट जगणे अवघड करत आहेत.
करोना होऊन गेल्यानंतर एक वर्षांनी अनेकांना पाय दुखणे, हार्ट ऍटॅक, छाती दुखणे, शरिरातील साखरेचे प्रमाण वाढणे यासह आदी व्याधींचा सामना करावा लागत आहे. पिंपरीतील अनेकांचे खुबा, हाडे निकामी होत असल्याने शस्त्रक्रियाच करणे भाग पडले आहे. त्यामुळे करोनातून जीव वाचला, पण साइड इफेक्टने जगणे बेहाल केल्याची भावना रुग्ण व्यक्त करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात आत्तापर्यंत शहरात 3 लाख 70 हजार 713 जणांना करोनाची लागण झाली.
तर 4 हजार 629 नागरिकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाणही खूप अधिक वेगाने वाढले. रुग्णांचा जीव वाचविणे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक ठरत होते. आक्रमक पद्धतीने उपचार करत डॉक्टरांनी लाखो रुग्णांची करोनातून मुक्तता केली. परंतु अजूनही अनेक रुग्णांना त्या औषधांचा साइड इफेक्ट जाणवत आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, करोना होऊन गेलेल्या व्यक्तीचा खुबा निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. करोना झालेल्या रूग्णांमध्ये हिप बोनचे प्रमाण 10 पटीने वाढले आहेत. करोना झालेल्यांना हार्ट ऍटॅक, रक्ताच्या गाठी बनण्याचे प्रमाण वाढले आहे.
खुब्यामध्ये बॉल बसविला
रोहित खर्गे यांनी सांगितले की, नियमितपणे व्यायाम करत असल्याने आयुष्याच्या 50 वर्षापर्यंत कधीच डॉक्टरकडे जाण्याची वेळ आली नव्हती. पण, करोनाने गाठल्याने आणि त्यात निमोनियाही झाला त्यामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागले. स्कोर 23 वर गेल्याने सात रेमिडेसिवीर इंजेक्शन, स्टेरोइड आणि औषंधाचे अधिकचे डोस द्यावे लागले. त्यावेळी करोनातून तर बाहेर आलो पण वर्षभरानंतर दोन्ही पाय प्रचंड दुखू लागले. त्यामुळे एक्स-रे काढला. त्यात दोन्ही पायाच्या खुब्यांचा रक्त पुरवठा बंद झाल्याचे निदर्शनास आले. रेमेडिसविर सह इतर औषंधाच्या अधिकच्या डोसमुळे रक्त पुरवठा बंद झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वायसीएममध्ये डॉ. रितेश पाठक यांनी शस्त्रक्रिया केली. ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून खुब्यामध्ये बॉल बसविला आहे. आता डावा पाय ठीक होत असून काठीच्या सहाय्याने चालता येऊ लागले आहे. एक महिन्यानंतर उजव्या पायाचे ऑपरेशन करायचे ठरले आहे.
हाडांचा ठिसूळपणा वाढला
तुळशीदास शिंदे यांनी सांगितले की, करोना झाल्यानंतर नऊ रेमिडेसिवीर इंजेक्शन घ्यावे लागले. करोनातून बरा झालो. मात्र, एक वर्षांनी गुडघे, सांधे आणि खुबा दुखू लागला. तर एमआरआय केल्यानंतर खुब्यांच्या हाडाचा रक्तपुरवठा कमी झाला होता. त्यामुळे हाड कुजायला लागले होते. हाडांचा ठिसूळपणा वाढल्याचे आढळले. शहरातील दोन नामांकित रूग्णालयात पुढील उपचारासाठी चौकशी केली. मात्र, खुब्यांचे हाड बदलायचे असताना खुबाच बदलण्याचा सल्ला संबंधित रूग्णालयातील डॉक्टरांनी दिला. त्यामुळे पुण्यातील रूग्णालयात जाऊन वेळीच उपचार घेतले. डावी बाजू आता पूर्वपदावर येत असून उजवी बाजूही पुढील महिन्यामध्ये पूर्वपदावर येईल. त्यामुळे करोना होऊन गेलेल्या नागरिकांचे पाय दुखत असतील तर त्यांनी वेळीच लक्ष देऊन उपचार घ्यावेत, असा सल्लाही शिंदे यांनी दिला.
करोना होऊन गेलेल्या व्यक्तीचा खुबा निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. करोनात अनेकांना रेमिडेसिवीर इंजेक्शन, स्टेरोइड देण्यात आले होते. रेमिडेसिवीर किंवा स्टेरोइडमुळे खुबा निकामी होतोय, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, करोनामुळेच खुब्याचा बॉल निकामी होत आहे. करोना झालेल्या रूग्णांमध्ये हिप बोनचे प्रमाण 10 पटीने वाढले आहेत. करोना झालेल्यांना हार्ट ऍटॅक, रक्ताच्या गाठी बनण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे करोना होऊन गेलेल्या नागरिकांचा जर खुबा दुखत असेल तर त्यांनी तात्काळ एक्सरे न काढता एमआरआय करावा. एमआरआयमध्ये हिप बोनची सर्व स्थिती दिसून येते.
– डॉ. एन. जे. कर्णे, ऑर्थोपेडिक