महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर मोठे उलटफेर झाले. निवडणुकांमध्ये एकत्र लढलेल्या भाजप-शिवसेनेच्या युतीचा मुख्यमंत्रीपदावरून काडीमोड झाला. पुढे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीच्या नावाखाली राज्यात सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा असलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले तर भाजपला राज्यात सर्वाधिक आमदार असूनही विरोधकांच्या बाकावर बसावे लागले.
या सर्व घडामोडी सुरु असतानाच राज्याचा राजकीय इतिहासात यापूर्वी कधीही न झालेला प्रयोग देखील झाला. सेनेसोबत काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्तास्थापनेची बोलणी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपममुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
मात्र अजित पवार यांनी बंडाचे निशाण खाली घेतल्यानंतर केवळ ८० तासात कोसळलेल्या या सरकारचा पहाटेचा शपथ विधी आजही सर्वांच्याच स्मरणात आहे. यावरून आताही अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतात. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे अजित पवार यांना फडणवीस यांच्यासोबत शपथ घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पाठवलं होत का
एका कार्यक्रमात या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी, “२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपासोबत पाठवलं अशी चर्चा होत असते हे खरं आहे. पण मी त्यांना पाठवलं असतं, तर त्यांनी राज्यच बनवलं असतं. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं. मी अजित पवार यांना पाठवलं होतं यात काहीच अर्थ नाही.” असं उत्तर दिलं.
शरद पवार यांनी दिलेल्या या उत्तरावरून पुण्यामध्ये पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते चांगलेच भडकले. “जेव्हा सर्वोच्च नेते बोलतात तेव्हा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने अजून त्यावर वक्तव्य करून गैरसमज पसरवण्याचं काही कारण नाही. त्यांनी काय सांगितलं ते तुम्ही ऐकलेलं आहे. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही. मी सुरुवातीलाच सांगितलंय, जेव्हा मला वाटेल, तेव्हा मी त्यावर बोलीन. तो माझा अधिकार आहे.. संपला विषय” असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.