जामखेड (प्रतिनिधी) – तालुक्यात गेल्या अनेक दिवसात कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत घट झाली मात्र, अनेक ठिकाणी रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे पथक सुस्त झाल्याचे दिसून आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जामखेड शहरात मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाईला प्रशासनाने सुरुवात केली आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग धोकादायक बनत चालला आहे.त्यातच नव्याने आलेल्या ओमायक्रॉनचे संकट दारात उभे राहिले आहेत. त्याला रोखण्यासाठी उपाय योजना हाच मोठे साधन आहे. नुकतेच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मास्क न घालणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये मास्क वापरणे सर्वांना सक्तीचे करण्यात आले आहे.
दरम्यान दुसऱ्या लाटे नंतर आतापर्यंत प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करताना कुठेही दिसली नाही. अधिकारी सुस्त असल्याचे दिसून येत होते .मात्र, आता कोरोनाची तिसरी लाटेच्या भीतीपोटी पालिका प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण अशी टीका होत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. शहरातील गर्दीची सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठेतील ठिकाणी ही कारवाई केली जात आहे. या कारवाईसाठी प्रशासनाने पथक तयार केली आहे.
गुरुवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकरी मिनीनाथ दंडवते,जामखेड पोलीसस्टेशनचे निरीक्षक संभाजीराव गायकवाड हे स्वतः कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते. सदर कारवाई खर्डा चौकातून सुरू झाली असून संपूर्ण शहरात राबविण्यात येत आहे. यावेळी पोलीस व नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने कारवाई करताना दिसत होते दरम्यान विना मास्क वाहन धारक व दुकानदारांकडून दंड वसूल करण्यात येत आहे.