सेंच्युरियन :वेगवान गोलंदाज मोहम्मद शम्मी आणि जसप्रीत बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 113 धावांनी विजय मिळवला. दक्षिण अफ्रिकेच्या सेंच्युरिअन मैदानात भारताने पहिला कसोटी विजय मिळवला आहे.
या विजयासह तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य दिले होते. पण दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 191 धावांवर संपुष्टात आला आणि भारताने 113 धावांनी विजय मिळवला.
काल चौथ्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या 4 बाद 94 धावा झाल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात एडन मार्करम, केगीन पीटरसन व रुसी वॅन दर दुसेन यांनी साफ निराशा केली. एका बाजूने डीन एल्गर नाबाद 52 धावांच्या जिद्दी खेळीसह नाबाद होता.
आज कसोटीचा पाचवा आणि अखेरचा दिवस होता. आज सकाळी दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावाला पुढे सुरुवात केली. एल्गर खेळपट्टीवर असेपर्यंत भारताच्या विजयाबद्दल थोडी धाकधूक वाटत होती. पण जसप्रीत बुमराहने त्याला 77 धावांवर पायचीत बाद करून भारताच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला. पाचव्या दिवशी भारताने दक्षिण अफ्रिकेचे 6 गडी झटपट बाद केले आणि विजय साकार केला. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने 3, मोहम्मद शमीने 3, मोहम्मद सिराजने 2 आणि आर. अश्विनने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – 327 धावा. दक्षिण आफ्रिका पहिला डाव – 197 धावा. भारत दुसरा डाव – 50.3 षटकांत सर्वबाद 174 धावा. (ऋषभ पंत 34, लोकेश राहुल 23, अजिंक्य रहाणे 20, चेतेश्वर पुजारा 16, रवीचंद्रन अश्विन 14, शार्दुल ठाकूर 10, अवांतर 27, कागिसो रबाडा 4-42, मार्को जेन्सन 4-55, लुंगी एन्जीडी 2-31) दक्षिण आफ्रिका दुसरा डाव – 68 षटकांत सर्वबाद 191 धावा. ( डीन एल्गर 77, क्विंटन डिकॉक 21, केगीन पीटरसन 17, टेम्बा बवुमा नाबाद 35, जसप्रीत बुमराह 3-50, महंमद शमी 3-63,महंमद सिराज 2-47, अश्विन 2-18).