नगर – माणूस शनि देवाच्या चरणी लीन होतो, ते महाचूक ध्यानात आल्यावर. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन 24 तास उलटत नाही, तोच उद्धव ठाकरे शनिशिंगणापूरच्या येऊन शनिदेवाच्या चरणी लीन होतात, यावरून त्यांच्या मागे शनिदेव लागले आहेत, हे स्पष्ट होत आहे. भविष्यात आणखी काही नुकसान होऊ नये, म्हणून ते शनिदेवाच्या चरणी लीन झाले आहेत, असा दावा भाजपचे प्रवक्ते आमदार राम शिंदे यांनी शुक्रवारी येथे केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाच्या नियोजना संदर्भात झालेल्या बैठकीनंतर आ. शिंदे यांनी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरे आज निवडणुका घेण्याची मागणी करतात, परंतु 2019 मध्ये त्यांनी जेव्हा आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याच वेळी त्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याचे धाडस का केले नाही, असा सवालही आ.शिंदे यांनी केला.
ठाकरे यांनीच नैतिकता पूर्ण गमावली आहे. त्यामुळे नैतिकतेवर गप्पागोष्टी मारण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही. तीन चतुर्थांश बहुमत असताना आम्हाला सोडून त्यांनी दुसऱ्याशी लग्न लावले. असे असताना नैतिकतेची भाषा त्यांना शोभत नाही. भाजप- शिवसेनेला जनतेने बहुमत दिले असताना तेव्हा ठाकरेंनी नैतिकता घालवली, त्यामुळे त्यांना आज नैतिकतेवर बोलण्याचा काही अधिकार नाही.
बाजार समिती निवडणुकांमध्ये कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यात नऊ-नऊ असे समसमान सदस्य निवडून आले आहेत. आमच्या पारदर्शक कारभारावर जनतेने आम्हाला संधी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात सभापती पदे आम्हालाच मिळतील. ईश्वरी चिठ्ठी निघाली तरी त्यात आम्हालाच संधी मिळेल, असा दावा आ. शिंदे यांनी केला.
खासदारकीचा पुनरुच्चार!
2014 मध्ये लोकसभा लढवण्याची माझी इच्छा होती तर 2019 मध्ये लोकांचा आग्रह मी लोकसभा लढवावी असा होता. मात्र त्यावेळी पक्षाकडून काही निर्णय झाला नाही व नंतर मी विधान परिषदेचा आमदार झालो. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी उतरणार आहे, मात्र लोकसभा लढवण्याचीही माझी इच्छा आहे व एक वर्ष आधीच ही इच्छा मी बोलून दाखवली आहे असा पुनरुच्चारही आ. शिंदे यांनी केला.