पाटणा -कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना कालपर्यंत नेता मानण्यास भाजप नकार देत होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच आता राहुल यांना नेता म्हणून मान्यता दिली आहे, असा दावा जेडीयूने केला आहे.
शहा यांची गुरूवारी बिहारमध्ये सभा झाली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह राहुल यांनाही टीकेचे लक्ष्य केले. कॉंग्रेस मागील 20 वर्षांपासून नेता म्हणून राहुल यांना लॉंच करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे, अशी खिल्ली शहा यांनी उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल यांच्यापैकी कोण याची निवड जनता पुढील लोकसभा निवडणुकीत करेल, असेही त्यांनी म्हटले.
तो धागा पकडून नितीश यांच्या पक्षाचे (जेडीयू) प्रवक्ते राजीव रंजन यांनी राहुल यांच्या विषयीचा दावा केला. नितीश यांनी मागील आठवड्यात आयोजित केलेल्या बैठकीत विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना निश्चित आकार मिळाला. आता एकत्र आलेल्या विरोधकांचे नेते म्हणून शहांनी राहुल यांना स्वीकारले आहे, असे त्यांनी म्हटले. त्यातून जेडीयूने शहा यांनी केलेल्या टीकेचे अतिशय खुबीने वापर केल्याचे दिसून येत आहे.