लोणी धामणी – गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्न मुहूर्त होते; पण करोना महामाराच्या संकटामुळे या मुहुर्तावर होणाऱ्या लग्नसोहळ्यांवर निर्बंध आले. साधेपणाने आणि कमीत कमी दहा ते पंधरा नातेवाइकांच्या उपस्थितीमध्ये समारंभ पार पडले. साधेपणाने लग्न करताना देखील अनेक अडचणी आल्या. हे लक्षात घेऊनच त्या अडचणी दूर करून करोनापासून सुरक्षित आणि कमी खर्चात लग्नाचा आनंद सोहळा कसा करता येईल याचा विचार करून सुविधा देण्याचा प्रयत्न आता या क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यावसायिकांकडून होत असून, त्याचा फायदा ग्रामीण भागातील शेतकरी बंधूंना मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेषतः शेतकरी वधू पित्यांसाठी कमी खर्चात उरकणारा लग्न सोहळा काहीसा दिलासा देणारा आहे.
कोरोना महामारीच्या काळामध्ये लग्नाचा इव्हेंट कसा करायचा, याचे पॅकेज आता बाजारात आले आहेत. फक्त चाळीस ते पन्नास लोकांमध्ये लग्नसोहळा पार पाडण्यासाठी 25 ते 50 हजार रुपयापर्यंतची पॅकेजेस आयोजकांनी आणली आहेत. अगदी आपल्या घरासमोरच सामाजिक अंतर ठेवून आणि करोनाबाबत संपूर्ण खबरदारी घेऊन लॉकडाऊन आणि सरकारने दिलेल्या नियमावलीमध्ये विवाह सोहळा पार पाडून देणारे हे पॅकेज आहे. उपस्थित व्यक्तींची मर्यादा तसेच प्रत्येकाच्या लग्न खर्चाच्या बजेटनुसार आयोजकांकडून पॅकेज देऊ केले जात आहे.
या पॅकेजमध्ये सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर मिटर, टेंट वजा मंडपातील या तंबूमध्ये विवाहसोहळा करण्याची कल्पना “इव्हेंट’वाल्यांनी पुढे आणली आहे. संपूर्ण तंबूचे निर्जंतुकीकरण करून त्यामध्ये सामाजिक अंतर ठेवत बैठकीची व्यवस्था, मास्क, मेकपसाठी व्यक्ती, ब्राह्मण, जेवण, लग्नाचे हार, अक्षता, फोटोग्राफर शूटिंग यासह आवश्यक गोष्टी या पॅकेजमधून पुरवण्यात येत आहेत.
विवाह सोहळ्याशी संबंधित व्यावसायिकांना सध्याच्या परिस्थितीचा सर्वात मोठा फटका बसला आहे. साक्षीगंध ते वरातीपर्यंतचा एक दिवसाचा खर्च मागील काही वर्षात लाखोंच्या घरात जाऊन पोहोचला आहे. मात्र, अशा थाटामाटात होणाऱ्या लग्न सोहळ्यास 2020 हे साल अपवाद ठरले आहे.
कार्यालय मालकांचे प्रचंड नुकसान लग्न कार्यालय मालकांचा या वर्षीचा संपूर्ण हंगाम वाया गेल्याने त्यांचे अर्थकारणच फसले आहे. वर्ष, सहा महिने अगोदरच लग्नासाठी बुकिंग केलेले कार्यालय मालक सध्या अडचणीत सापडले आहेत. करोना महामारीने लग्न सोहळ्यात लाखोंची कमाई करून देणाऱ्या व्यावसायिकांची साखळी उद्ध्वस्त झाली आहे.
मुलीच्या लग्नासाठी चार ते पाच लाख रुपये कर्ज काढायचे होते. हॉलचे बुकिंग केले होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये मे महिन्यात घरासमोरच मोजक्या लोकांमध्ये लग्न पार पडले. एकूण 25 हजार रुपये खर्च आला. आमचं शेतकरी कुटंब असल्याने मुलीच्या शिक्षणाचा व लग्नाचा खर्च न परवडणारा होता. करोना महामारीत कर्ज न काढता, जुन्या आठवणींना उजाळा देत घरासमोर झालेले लग्न कुटुंबासाठी अविस्मरणीय ठरले.
-पोपट बोऱ्हाडे, वधू पिता धामणी
वर्षभरात 65 ते 70 लग्न सोहळ्यांचे बुकिंग होते. सर्व खर्च वजा आठ ते नऊ लाख रुपये निव्वळ नफा होतो. मात्र करोना संकटामुळे कार्यालयाचे बुकिंग केलेले पैसे कार्य मालकास परत द्यावे लागले. वर्षभर कार्यालयाचा मेंटेनन्स कसा भागवायचा, हा प्रश्न आहे.
– रवी भोर,
मंगल कार्यालयाचे मालक, मेंगडेवाडी
करोनामुळे उदयास आलेली नवीन लग्न पद्धती समाजाला हितकारक आहे. शेतकरी किंवा सर्वसामान्य कुटुंबाला विवाह सोहळा कर्ज काढूनच करावा लागतो. ज्यांना 2-3 अपत्य आहेत त्यांना लग्न कर्ज काढून असे सोहळे करणे एक संकटच आहे. लॉकडाऊन काळातील लग्नसोहळा समाजाला व सामान्य, गरिब कुटंबाला तारक ठरत आहे.
– सागर जाधव, सरपंच धामणी