दिघी – पिंपरी चिंचवड महापालिका स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. परंतु अजुनही शहरातील बहुतांश ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा नागरिकांना मिळताना दिसून येत नाहीत. भोसरीतील आदर्शनगरमधील ओव्हाळ, शर्मा, म्हस्के चाळीत काही महिन्यांपासून ड्रेनेजलाइन तुंबल्याने दूषित पाणी नागरिकांच्या घरासमोरून वाहत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने येथील ड्रेनेजलाइन त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दुर्गंधीमुळे नागरिकही आजारी पडत आहेत. पिण्याच्या पाण्यालाही दुर्गंधी येत आहे. या भागात लोकसंख्या अधिक असतानाही महापालिकेने येथे कमी व्यासाची वाहिनी टाकल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे, ती वारंवार तुंबत आहे.
क्षेत्रीय कार्यालयाच्या ड्रेनेज विभागाला संपर्क साधला असता लवकर प्रतिसाद मिळत नाही. वारंवार तक्रार केल्यानंतर ते ‘चोक अप’ काढतात. मात्र, दोन-तीन दिवसांनी पुन्हा गटार तुंबून परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे येथील ड्रेनेजलाइन नवीन टाकून येथील नागरिकांची होणारी गैरसोय सोडवावी, अशी मागणी होत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
परिसराचे नाव आदर्शनगर आहे. परंतु महापालिका येथील नागरिकांना आदर्श सोयीसुविधा पुरवत नसल्याने दुर्गंधीयुक्त पाण्यातून त्यांना दररोज प्रवास करावा लागत आहे. परिसरातील लहान मुले अशा दूषित पाण्यात खेळत असल्याने नागरिकांसह लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने त्वरित येथील समस्या सोडविणे गरजेचे आहे.