पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दि. १८ फेब्रुवारीला राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर एकाचवेळी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवार (दि.२) फेब्रुवारीपासून शाळेच्या लाॅग-इन आयडीवर उपलब्ध करुन देण्यास सुरुवात झालेली आहे. सर्व विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांडून हॉल तिकीट प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे. सन २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ९ हजारांनी कमी आहे. सन २०२३ मध्ये इयत्ता पाचवीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख ३२ हजार ८७६ एवढी होती तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ६७ हजार ८०२ एवढी होती. एकूण ९ लाख ६७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
तर २०२४ मध्ये पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख १० हजार २१८ एवढी असून आठवीची विद्यार्थी संख्या ३ लाख ८१ हजार १६२ आहे. यंदा एकुण ८ लाख ९१ हजार ३८० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढुन तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे, अशा सूचनाही त्यांना परीक्षा परिषदेकडुन देण्यात आलेल्या आहेत.