नवी दिल्ली – पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आले तर प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण होईल याची इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांना कल्पना आहे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटले आहे. आज येथे पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
इंडिया अलायन्सच्या निवडणूक यशाबद्दल आपण कोणतेही भाष्य करू शकत नाही कारण आपण जागा वाटपाच्या प्रक्रियेत नाही. त्यामुळे मला मिळणारी माहिती सेकंड किंवा थर्ड हँड अशी असते, पण ही आघाडी मजबूत स्थितीत वाटचाल करीत आहे असे भाष्यही त्यांनी केले आहे.
ते म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिर हे आगामी निवडणुकीत एक घटक ठरू शकते पण “ते निर्णायक ठरेल की नाही, हे वेळच सांगेल”.चिदंबरम नुकतेच त्यांच्या ‘द वॉटरशेड इयर-विच वे विल इंडिया गो?’ या नवीन पुस्तकावरील चर्चेसाठी कोलकाता येथे आले होते.चिदंबरम पुढे म्हणाले की, काँग्रेस स्थिर आणि खोलवर रुजलेल्या राजकीय पक्षांसोबत इंडिया आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे.