पाटणा -बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी साथ सोडल्यानंतरही त्यांच्याविषयी कटूता नसल्याचे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी सूचित केले. विशेष म्हणजे, नितीश यांच्यासाठी नेहमीच दरवाजे खुले असल्याचेही त्यांनी म्हटले.
पुन्हा राजकीय कोलांडउडी मारत नितीश यांनी नुकतीच भाजपशी पुन्हा मैत्री केली. त्यामुळे बिहारमध्ये सत्ताबदल झाला. त्या राज्याच्या सत्तेतून राजद, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश असणाऱ्या महाआघाडीला बाहेर पडावे लागले.
ती उलथापालथ घडल्यापासून लालू मौन बाळगून होते. अशात गुरूवारी ते राजदचे उमेदवार राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करत असताना विधानभवनात उपस्थित राहिले. त्यावेळी लालू आणि नितीश समोरासमोर आले.
त्यांनी मनमोकळेपणाने एकमेकांशी हस्तांदोलन केले. त्यानंतर पत्रकारांनी लालूंना पुन्हा नितीश यांच्याशी जुळवून घेणार का, असा प्रश्न विचारला. ते जेव्हा येतील; तेव्हा पाहता येईल, असे उत्तर लालूंनी दिले.
तो प्रश्न आणखी लावून धरत पत्रकारांनी अजूनही नितीश यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत का, अशी विचारणा केली. त्यावर नेहमीच खुले असतात, अशी टिप्पणी लालूंनी केली.