-माधव विद्वांस
प्रथितयश ज्येष्ठ लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी, 1926 रोजी राजस्थानातील जोधपूर येथे झाला.ज्योत्स्ना केशव देवधर यांचे माहेरचे नाव कुसुम थत्ते होते. त्यांनी एम.ए.(हिंदी) पुणे विद्यापीठातून केले तसेच वर्धा येथून “साहित्य विशारद’ ही पदवी संपादन केली. पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी हिंदी आणि मराठी भाषेमधून लेखन केले.
वर्ष 1960 मध्ये निर्मात्या म्हणून आकाशवाणी पुणे केंद्रावर रुजू झाल्या. आकाशवाणीवर सलग 24 वर्षे त्यांनी काम केले, तसेच तेथे विविध जबाबदाऱ्या हाताळल्या. वरिष्ठ निर्मात्या म्हणून त्या निवृत्त झाल्या. नोकरीचा व्याप सांभाळात त्यांची लेखणीही अव्याहत चालू होती.
आकाशवाणीवरील “गृहिणी’ या कार्यक्रमातील “माजघरातील गप्पा’ या सदरातून त्या लोकप्रिय झाल्या.त्यांच्या साहित्य संपदेमध्ये 21 कथासंग्रह, 19 कादंबऱ्या, 4 ललितलेख संग्रह आणि अनेक नाटकांचा समावेश आहे. त्यांनी “अंतरा’ या हिंदी कथासंग्रहापासून साहित्य लेखनास सुरुवात केली.
प्रामुख्याने त्यांनी लिहिलेली “घर गंगेच्या काठी’ या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा “हरिभाऊ आपटे पुरस्कार’ मिळाला. “घर गंगेच्या काठी’ या चित्रपटाची कथा-पटकथा आणि संवादलेखनही केले. वर्ष 1968 मध्ये त्यांची “कल्याणी’ ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरली. लेखन तत्कालीन एकत्र कुटुंबातील महिलांच्या समस्यांवर आधारित असल्याने त्या महिलांना भावल्या. एकत्र कुटुंब पद्धती आणि तिच्यामधील स्त्री, हाच या कांदबरीचा गाभा होता. स्वानुभवातून तसेच निरक्षणातून या एकत्र कुटुंब पद्धतीचे गुण-दोष या कादंबरीतून त्यांनी प्रभावीपणे मांडले. “कल्याणी’ या कादंबरीतून एक दुःखी, दुर्दैवी विधवा व तिच्या जीवनात झालेली ससेहोलपट त्यांनी रेखाटली आहे. या कादंबरीचे चित्रपट-नाटकात रूपांतर झाले तसेच मालिकेच्या रूपानेही छोट्या पडद्यावर ती घराघरात पोचली. लहान मुलांसाठी “आजीची छडी गोड गोड छडी’ हे नाटकही लिहिले.
त्यांचे लेखन अत्यंत सोपे, साधे आणि भाषा, घराघरात बोलली जाणारी असल्याने ती वाचकांना भावणारी आहे. त्यांनी “पंडिता रमाबाईंचे चरित्र’ लिहिले. हे चरित्र लिखाणाचे एक उत्तम उदाहरण मानले जाते. त्यांच्या अनेक कथांचे कन्नड, तेलुगू, तमीळ, मल्याळम, आसामी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद झाले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेने “ज्येष्ठ साहित्यिक’ तर अखिल भारतीय भाषा साहित्य संमेलनात “भारत भाषा’ पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुणे मराठी ग्रंथालयाने “ज्येष्ठ लेखिका सन्मान’, अखिल भारतीय भाषा साहित्य संमेलनतर्फे “भाषाभूषण’ ही पदवी, तसेच महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे “विष्णुदास भावे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कराड येथे 1975 मध्ये झालेल्या पश्चिम महाराष्ट्र कथालेखिका संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. महाराष्ट्र राज्य नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे सभासदत्व, महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार निवड समितीवर सभासद म्हणून निवड झाली होती. त्यांचे 17 जानेवारी 2013 रोजी वयाचे 86 व्या वर्षी निधन झाले.