मुंबई : शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवेन, असे वचन मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले आहे. ते पूर्ण करेनच, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले. त्याचवेळी अमित शहा यांच्या सोबत चर्चा प्रगतीवर आहे. त्याबाबतचा अंतीम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, युतीच्याबाबत बोलायचं झालं तर आम्ही पाठीत खंजीर खुपसणार नाही.
मला महाराष्ट्रात सत्ता मिळवायची आहे. राज्यात सर्व 288 मतदार संघात शिवसेना मजबूतपणे उभी रहायला पाहीजे. युती झाल्यास भाजपच्या उमेदवारांसाठी शिवसैनिक जीवाचे रान करतील तशीच अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांकडूनही आहे, असे ते म्हणाले.शिवसेना ज्या जागा लढवेल तेथे पक्षाची तयारी पूर्ण झाल्याची हमी मला हवी आहे. शिवसैनिकांचा जोपर्यंत माझ्यावर विश्वास आहे तो पर्यंत मी माझी राजकीय वाटचाल सुरूच ठेवणार आहे. मी काही राजकारण सोडून शेती करायला जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांना चिमटा काढला.