मुंबई : केंद्रीय मंत्री व भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुढील दोन तीन महिन्यात राज्यात भाजपाचे सरकार असेल, असा दावा केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचे सरकार देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार असल्याचे म्हटले आहे. तसेच हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त करत दानवे यांना उत्तर दिले आहे.
खासदार संजय राऊत यांनी “हे सरकार चार वर्ष पूर्ण करेल. एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि चार वर्ष पूर्ण करेल. निराश झाल्यानेच तसेच सर्व प्रयत्न फसल्याने विरोधी पक्षातील नेते असे वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्रातील जनता या सरकारसोबत आहे. संपूर्ण देशातील मजबूत सरकार महाराष्ट्रात आहे”. तीन दिवसांचे सरकार जे केले होते त्याची आज पुण्यतिथी आहे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
“तीन दिवसाच्या सरकारचा एक प्रयोग झाला होता त्याची आज पुण्यतिथी आहे. आता हे तीन महिन्यात करणार असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जातील,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. “उद्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार योग्य काम करत आहे. तीन पक्षांचे सरकार असूनही भक्कम आहे. देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार महाविकास आघाडीचे आहे,” असे ते म्हणाले आहेत.