मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तडक फडकी राजीनामा दिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का होता. मात्र, आज (शनिवार) पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचे कारण सांगितले.
‘शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी पवार कुटुंबावर राजकीय सुडभावनेने कारवाई केली जात असून यामुळे मन विषण्ण झाल्याने मी आमदारकीचा राजीनामा दिला’ असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, पवार यांच्या विधानावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक टीका केली आहे.
मुनगंटीवार म्हणाले, “जनतेची काम करण्यासाठी तुम्ही आमदार झाला आहात, मन विषण्ण झाल्याने कोणी राजीनामा देतं का?’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. शिखर बँकप्रकरणी त्यांच्यावरील कारवाईत राज्य सरकारचा काहीही संबंध नाही, ही कुठल्याही प्रकारे सुडाची कारवाई नाही. यामध्ये केवळ मुंबई हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे.