लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी आणि शहा यांना लक्ष्य केले आहे त्याच अनुषंगाने तेलगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी मोदी-शहा या जोडगोळीवर टीका करताना त्यांना देशहितापेक्षा नेहमीच स्वार्थ महत्त्वाचा वाटत आला आहे, अशी टीका केली आहे. आडवाणी, वाजपेयी यांनी जपलेल्या मूल्यांना आता भाजपत काही किंमत राहिलेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात तेलगु देसम पक्ष, द्रमुक, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, कॉंग्रेस, जनता दल सेक्युलर आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर छापे टाकले आहेत. त्याच्या निषेधार्थ विजयवाडा येथे आंबेडकर पुतळ्यापाशी या पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, मोदींच्या काळात लोकांचे सर्व स्वातंत्र्य लयाला गेले आहे. समाजातल्या सर्वच घटकांमध्ये त्यांनी भय आणि असुरक्षेचे वातावरण निर्माण केले आहे. या माणसांपासून घटना आणि लोकशाही वाचवण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली सरकारच्या इशाऱ्यावर नाचू नये, असा इशाराही त्यांनी दिला.