मुंबई – जातीयता आणि धर्मांधता बाजूला ठेवून राजकारण करता येतं हे वाजपेयींनी शिकवलं, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. अटल बिहारी वाजपेयी हे उत्तम संसदपटू होते. माणुसकी काय असते, मानवता काय असते हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचे काम पाहता आले. त्यांनी देशाचे नेतृत्त्व केले. पक्षाचे नेतृत्त्व नव्हे. ते देशाचे नेते होते. देशाचे नेतृत्त्व कसे असावे हा परिपाठ त्यांच्याकडून घेता आला.
हिंदुत्त्वाच्या विचाराशी तडजोड न करता हा देश सर्वांचा आहे याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. देशातील एकात्मता कायम टिकली पाहिजे यावर भर देऊन राजकारण करणारे ते नेते होते. धर्मांधता, जातीयता या दोन शब्दांना दूर ठेऊन राजकारण करता येते हे अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखवून दिले, असा चिमटा राऊत यांनी काढला.
शिवसेना आणि भाजपची युती झाली. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयींचे योगदान होते. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना अनेक निर्णय घेण्यापूर्वी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करत. आजचा भाजप पाहता अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची आठवण येते, असेही ते म्हणाले.
काश्मीर प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी वाजपेयींनी प्रयत्न केले. लाहोरला बस घेऊन गेले, मुशर्रफ यांच्याशी चर्चा केली. मात्र, देशाच्या स्वाभिमानासाठी त्यांनी कारगील युद्धाचा मार्ग स्वीकारला, असे सांगतानाच अटलबिहारी वाजपेयी हे देशाचे असे नेते आहेत की त्यांचे स्मरण प्रत्येक जण करतो, असेही त्यांनी सांगितले.