नवी दिल्ली – राष्ट्रीय सुरक्षा हा केवळ बाह्य आक्रमाणापासूनची सुरक्षा नव्हे, याची व्याप्ती फार मोठी आहे ती लक्षात घेऊन त्याकडे व्यापकपणे बघणे महत्वाचे आहे, असे भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी म्हटले आहे. इंडिया इंटरनॅशनल सेंटरने आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय सुरक्षा दृष्टीकोन’ या विषयावर ते बोलत होते.
माजी लष्करप्रमुखांनी अंतर्गत आणि बाह्य दोन्ही सुरक्षा आयाम अधोरेखित करताना सांगितले की भारताला कोणतीही प्रादेशिक विस्ताराची महत्वाकांक्षा नाही. तसेच भारत आपल्या इच्छा किंवा धोरणे अन्य राष्ट्रांवर लादत नाही. पण जेव्हा आपण राष्ट्रीय सुरक्षेबद्दल बोलतो तेव्हा आपण अंतर्गत सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. बाह्य सुरक्षेला अर्थातच अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशाची सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
राष्ट्रीय सुरक्षेबरोबरच देशातील अन्न, ऊर्जा आणि आरोग्य सुरक्षेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही संकल्पना अधिक स्पष्ट करताना ते म्हणाले की, जर तुमच्याकडे निरोगी लोकसंख्या नसेल, तर सशस्त्र दलांसाठी सशक्त मनुष्यबळ कोठून आणणार? त्यामुळे अन्न आणि आरोग्य सुरक्षाही महत्वाची आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा हा विषय अधिक व्यापक संदर्भात पाहणे महत्वाचे आहे. भारताकडे अजूनही स्पष्ट राष्ट्रीय सुरक्षा धोरण नाही, असे त्यांनी नमूद केले.
देशाच्या उत्तरेकडील सीमा सुरक्षित करण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, “आमच्या एकूण सुरक्षेमध्ये प्रादेशिक आणि जागतिक स्थितीलाही महत्व आहे. आमच्या शेजारी देशांमधील कोणतीही अस्थिरता आमच्यावर परिणाम करणारी ठरू शकते. आमच्या सीमेवर अधिक अस्थिरता निर्माण झाली तर तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी आणि यासारख्या आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांमध्ये वाढ होईल,असे त्यांनी नमूद केले.