कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत अनेक केमिकल कंपन्या आहेत. वास्तविक केमिकल कंपन्यांसाठी असणारी औद्योगिक वसाहत ही समुद्र सपाटीपासून खालच्या अंतरावर उभारली जाते. मात्र, याला कुरकुंभ औद्योगिक वसाहत अपवाद असून ही समुद्र सपाटीपासून उंच पातळीवर आहे. याचा परिणाम हवेत दूषित वायू व नदी प्रदूषण होत आहे. एवढी गंभीर बाब असतानाही केमिकल झोनला परवानगी देण्यात आली आहे.
14 ऑगस्ट रोजी औद्योगिक वसाहतीतील अल्कली अमाईन्स या कंपनीला आग लागली होती. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण आगीचे लोळ एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत होते की त्यामुळे संपूर्ण पंधरा ते वीस किलोमीटर परिसराला धोका असल्याची चर्चा होती. त्यामुळे नागरिक गाव सोडून पळू लागले होते. यापूर्वी औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमध्ये छोटे-मोठे स्फोट होऊन काहींना आपले प्राण गमवावे लागलेले होते. ही परिस्थिती या औद्योगिक वसाहतीत का घडते? त्याच्याकडे कोणीही गांभीर्याने पाहताना दिसत नाही. आमदार राहुल कुल यांनी मागील काही दिवसांपूर्वी दर दोन महिन्यांनी कंपन्यांकडून होत असणारे प्रदूषण आणि कामगारांची सुरक्षितता याबाबत आढावा बैठक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतल्या होत्या. त्यावेळी काही कंपन्यांचे अधिकारी उपस्थित राहत नव्हते किंबहुना उपस्थित राहिलेले अधिकारी संक्षिप्त माहिती त्या बैठकीत देत नव्हते. सतत होणाऱ्या अपघातामधून केमिकल कंपन्यांनी बोध घेऊन ते थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.