पुणे – दर पावसाळ्यात भीमा नदीला येणाऱ्या पुरामुळे होणारी हानी लक्षात घेऊन ती टाळण्यासाठी देशपातळीवरील तज्ज्ञांच्या सहभागाने विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. नदीच्या उगमापासून ते कर्नाटक राज्याच्या हद्दीपर्यंतची पुराची कारणे, परिणाम, आपत्ती टाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना ही समिती सुचविणार आहे. या समितीने भीमा नदीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच नदीकाठच्या नागरिकांशी संवाद साधला. पुराच्या अनुषंगाने भीमा खोऱ्याचा अभ्यास पहिल्यांदाच होत आहे. समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून शासनाला सादर केला जाणार आहे.
जलसंपदा निवृत्त सचिव राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये बारा सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने भारतीय हवामान विभागातील तज्ज्ञ, आयआयटी मुंबई, केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्था (सीडब्लूपीआरएस), महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर आदींसह सामाजिक संस्थांचा समावेश करण्यात आला आहे.
सह्याद्री पर्वतरांगात सुमारे 6 हजार मिमी पाऊस पडतो. डोंगररांगापासून पुढे 50 किमीपर्यंत पावसाचे प्रमाण असेच राहते. त्यानंतर पुढे 25 किमीपर्यंत 600 मिमी पाऊस पडतो. उगमापासून 100 किमी परिसरात 350 मिमी पाऊस पडतो. पुढील टप्प्यात पावसाचे प्रमाण कमी होऊन ते 25 मिमी इतके होते. या सर्व बाबींचा अभ्यास करण्यात आला आहे.
*भीमेच्या उपनद्या : भामा, इंद्रायणी, वेळ, पवना, मुळा-मुठा, घोड, मीना, कुकडी, पुष्पावती, निरा, माण, सिना आणि भोगावती
*उपलब्ध भूजल साठा : वापरण्यायोग्य 3,440 दलघमी, सध्याचा वापर 3 हजार 535 दलघमी
*विहिरींची संख्या – लाभक्षेत्रातील 1 लाख 24 हजार
*पाणलोट – उपखोऱ्यांमध्ये एकूण 197 पाणलोट
*मोठी धरणे – पाच, मध्यम प्रकल्प 34, लघु प्रकल्प 614, स्थानिक लघु प्रकल्प (जिल्हा परिषद स्तरावरील 3 हजार 692)
*एकूण पाणीसाठा क्षमता – 6 हजार 70 दलघमी