मराठी साहित्याचे शिलेदार कोण ? परिसंवादातील सुर
सातारा : सामाजिक माध्यमांच्या प्रभावी वापरामुळे त्याची ताकद वापरूनच नव्या साहित्याचे वारसदार आपल्याला शोधावे लागतील. समीक्षणाच्या चौकटी बदलाव्या लागतील, तरुण पिढीची नवीन तंत्रज्ञानाची भाषा शिकावी लागेल, सोबत सृजनात्मक साहित्य निर्मिती सुद्धा करावी लागेल, असा परस्पर समन्वयक सूर मराठी भाषेचे शिलेदार कोण? या परिसंवादात व्यक्त झाला.
ग्रंथ महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रामध्ये वारसदाराच्या भूमिकेविषयी सहभागी वक्त्यांनी जोरदार मांडणी केली. या परिसंवादामध्ये मराठी भाषा मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, महाराष्ट्र साहित्य परिषदेत शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, आणि लेखक बाळासाहेब लबडे इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे होते.
प्राकृत मराठी भाषेची मांडणी करताना बाळासाहेब लबडे म्हणाले, लेखन, मनन, चिंतन या माध्यमातून भाषा जिवंत राहते. मराठी भाषेचे वैभव शिलालेख, ताम्रपट, कोकणी मोडी, अहिराणी अशा विविध माध्यमातून व्यक्त होत राहिली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची चळवळ सुरू आहे. नवीन वारसदारांसाठी समूह शाळांचा झालेला निर्णय, नवीन शैक्षणिक धोरण, मराठी शाळा टिकणार का हा निर्माण झालेला प्रश्न यावर व्यापक चिंतन करावे लागेल. वाचन लेखन श्रवण झाले नाही तर भाषा मृत होते. मोबाईलचा धोका आहे. सजग वाचक आणि सकस साहित्य निर्मिती यातूनच आपल्याला नवीन वारसदार निर्माण करावे लागतील.
उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे म्हणाले, चांगल्या वाचनाची सह्रदयता जपता आली पाहिजे. लेखकाची मांडणी हा त्याचा आत्मविष्कार असतो त्यासाठी लेखकाची दृष्टी कल्पक असावी लागते. आपल्याला पुढच्या पिढीसाठी मोबाईलला पर्याय म्हणून सक्षम पुस्तकांचा पर्याय द्यावा लागेल. वारसदार सजग वाचक ठरवतील मराठी साहित्यामध्ये सकस साहित्य अनुभव यातून नवीन निर्माण होणारे साहित्य यातूनच वारसदारांची परंपरा निर्माण करावी लागेल.
मराठी अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष संदीप सांगळे म्हणाले, रसिक जर चिकित्सक असतील तर वक्त्याच्या बोलण्याला अर्थ आहे. लेखन प्रपंचाचे आपण सर्वजण भोई आहोत. एक अस्वस्थ कोलाहल समाज व्यवस्थेत आहेत, त्यासाठी टोकदार अनुभव देणारे साहित्य निर्माण करावे लागेल आणि या साहित्यामध्ये प्रगल्भ भर घालून तो वारसा पुढे घेऊन जाण्याची काम सक्षमपणे आजच्या पिढीला करावे लागेल. त्यासाठी तो संस्कार देण्याची भूमिका तो वारसा शास्त्रीय दृष्ट्या हस्तांतरित करण्याची भूमिका आपल्याला ठेवावी लागेल त्यापलीकडे मराठी भाषेविषयी संवेदनशीलतेची बांधिलकी असावी तरच मराठी साहित्याचे वारसदार निर्माण होतील वेगवेगळ्या समूहाची अस्वस्थता दुर्लक्ष करून चालणार नाही त्यांचे साचलेपण व्यक्त होण्यासाठी त्यांना साहित्यातून संधी दिली गेली पाहिजे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शाहूपुरी शाखा अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी म्हणाले, जग बदलतय सामाजिक माध्यमांची ताकद वाढलेली आहे. या माध्यमांच्या वापरातूनच आपल्याला पुढच्या पिढीचे आणि साहित्याची सृजनात्मकता बाळगणारे वारसदार आपल्याला शोधावे लागतील. तरुण पिढीची भाषा शिकावी लागेल. जग बदलते म्हणून समीक्षणाच्या चौकटी बदलाव्या लागतील. प्रत्येक साहित्य निर्मितीमध्ये चौकटी बाहेरचा विचार द्यावा लागेल. तो आशयघनं आणि वाचनीय असेल तर लोक निश्चितच त्या साहित्याला पसंती देतील फक्त साहित्यातील भाषा ही तंत्रयुक्त असेल त्या तंत्रज्ञानासह साहित्याच्या नव्या व्याख्या तयार कराव्या लागतील.
या परिसंवादाचा नेमका सूर पकडत डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, सृजन साहित्य निर्मिती व लेखन प्रपंच आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड यातूनच नव्या वारसदारांना मोठी संधी आहे असे सांगून त्यांनी समन्वयक भूमिका मांडली.
सातारा – परिसंवादात बोलताना विनोद कुलकर्णी, व्यासपीठावर डॉ. संदीप सांगळे, रवींद्र खंदारे, बाळासाहेब लबडे, शिरीष चिटणीस आदी