पुसेगाव – राज्यभरात थंडीची लाट आली असून ग्रामीण भागात गारठा वाढला आहे. तीन ते चार दिवस ढगाळ वातावरणाबरोबरच थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या ग्रामीण भागात कडाक्याच्या थंडीने हुडहुडी भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यापासून संरक्षणासाठी ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी ऊबदार कपडे खरेदीस सुरुवात केली आहे. सध्या दिवसभर ढगाळ वातावरण, मध्येच ऊन अन् गार वारा वाहत आहे. रात्री थंड गारवा अन् पहाटे कडाक्याची थंडी असे विचित्र हवामान जाणवत आहे. विचित्र हवामान नागरिकांच्या आरोग्यावर परिणामकारक ठरत आहे. सर्दी, ताप, खोकला, पेशी कमी होण्याचे प्रकार वाढले आहेत.
रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. खासगी व सरकारी दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसत आहे. शेतात गहू, हरभरा, ज्वारी पिकांची चांगली वाढ झाली आहे. थंडीचा कडाका वाढल्याने या पिकांना लाभदायक ठरत आहे. रब्बीच्या पिकांना सध्या पोषक वातावरण असल्याने उत्पन्नात वाढ होण्याची आशा वाढली आहे.
वीजपंपांसाठी दोन टप्प्यात वीजपुरवठा केला जातो. दिवसा वीजपुरवठा पुरेशा दाबाने होत नसल्याने व पाण्याचे प्रमाण् कमी असल्याने गहू, हरभरा व ज्वारी वअन्य पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. कडाक्याची थंडी वाढल्याने शेतकऱ्यांना शेतातच शेकोटी पेटवावी लागत आहे.