डॉ. दिलीप येळगावकर; योजनेत माझ्यासह अनेकांचे योगदान
वडूज – जिहे-कठापूर योजनेत कृष्णा नदीचे पाणी नेर धरणात सोडण्याची चाचणी नुकतीच झाली. या योजनेसाठी माझ्यासह अनेकांचे योगदान आहे. हे पाणी सातेवाडी तलाव व एनकूळपर्यंत पोहोचेल, तेव्हाच समाधान वाटेल, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले, जिहे-कठापूर योजनेचा आराखडा निवृत्त अभियंता मंडळाने तयार केला, तर सैनिक बॅंकेचे संस्थापक कर्नल आर. डी. निकम व सैनिक संघटनेच्या लोकांनी ही योजना शासनाकडे सादर केली होती. राज्यात 1995 मध्ये युती शासन आल्यावर, या योजनेच्या मंजुरीसाठी गोपीनाथ मुंडे, तत्कालीन मंत्री महादेव शिवणकर, एकनाथ खडसे यांच्याकडे मी पाठपुरावा केला होता. त्यात भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांचे सहकार्य लाभले होते. सर्वांच्या पाठपुराव्यामुळे 26 कोटी 90 लाख रुपयांच्या योजनेला मंजुरी मिळून काम सुरू झाले.
त्यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात या योजनेकडे दुर्लक्ष झाल्याने, आ. सुरेश खाडे व मी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते. वडूजलाही कार्यकर्त्यांचे आंदोलन झाले होते.
परिणामी योजनेचे काम पुन्हा सुरू झाले. निधीसाठी केंद्रीय जल आयोगाचा असलेला अडथळा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून दूर करण्यात आला. मागील भाजप सरकारमधील पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांनीही या योजनेला न्याय दिला. सरकार पुन्हा बदलल्याने दोन वर्षे योजनेची फाइल मंत्रालयात धूळ खात पडली होती. त्यासाठी मंत्रालयात हेलपाटे मारले. मायणी परिसराला टेंभूचे पाणी मिळवून दिले, त्याचप्रमाणे सातेवाडी, पेडगाव, एनकूळ, कणसेवाडी परिसराला पाणी देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
त्यासाठी शरद पवार यांना भेटलो; परंतु त्यांनी मंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला. जयंत पाटील यांनाही भेटायचा प्रयत्न केला; परंतु ते टाळाटाळ करत असल्याने, तेच दुष्काळी भागाच्या पाणी प्रश्नातील अडथळा आहेत. जिहे-कठापूर योजना पूर्ण होण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याबरोबर खटाव-माण तालुक्यातील जनतेला घेऊन पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू.
दरम्यान, जिहे-कठापूरच्या लढाईबद्दल डॉ. येळगावकर यांचा व एसटीचे निवृत्त वाहत्ूक नियंत्रक संभाजी इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.डॉ. हेमंत पेठे, सतीश शेटे, चंद्रकांत काळे, अंकुशराव दबडे, नाना पुजारी, चंद्रकांत खुस्पे, गोपीनाथ खाडे, युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष मंदार जोशी, सुशील तरटे, अशोक काळे, बाळासाहेब पाटील, गणपत खाडे-पाटील, बाळासाहेब जगदाळे, ब्रह्मदेव जगदाळे, शालीवान निकम, संभाजी कदम, सुखदेव जाधव, छगन कदम, मधुकर कदम, सूरज भांडवलकर, शिवाजी गोडसे, सदाशिव देशमुख, सुयोग शेटे, अंकुश राऊत, नीलेश जाधव, मिलिंद निकाळजे उपस्थित होते.