पुणे – शहरात लॉकडाऊन निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत. वाहनांची वर्दळ पुन्हा वाढल्याने शहरातील हवेमधील प्रदूषकांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळेच शहरातील हवेची गुणवत्ता ही “उत्तम’वरून “समाधानकारक’ पातळीवर पोहचली असल्याचे निरीक्षण सफर- आयाअयटीएम संस्थेने नोंदविले आहे.
लॉकडाऊन काळात शाळा, महाविद्यालये तसेच अनेक उद्यओगही बंद होते. तसेच नागरिकांना घराबाहेर पडण्यास मर्यादा असल्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात घटली होती. वाहनांमुळे होणारे कार्बन उत्सर्जन हे शहरातील हवेच्या प्रदूषणाचे प्रमुख स्रोत मानले जाते. मात्र वाहनांची वर्दळ कमी झाल्याने प्रदूषणाचे प्रमाणही कमी झाले होते. त्यामुळे लॉकडाऊन काळात हवेची गुणवत्ता उत्तम स्थितीत होती. मात्र, ऑगस्ट महिन्यापासून लॉकडाऊनचे नियम टप्प्या टप्प्याने शिथिल करण्यात आले.
दरम्यान, या काळात पाऊस पडत असल्याने प्रदूषके पावसाच्या पाण्यात विरघळल्याने हवेचे गुणवत्ता चांगल्या स्थितीत होती. परंतु, ऑक्टोबर महिन्यात शहर पुन्हा एकदा पूर्णपणे खुली झाली. शाळा, महाविद्यालये सुरू झाले. दुकाने, हॉटेल्स आणि व्यवसायही पूर्णक्षमतेने सुरू झाल्याने दैनंदिनपणे नागरिक घराबाहेर पडू लागले. त्यातच दसरा-दिवाळी या सणांच्या खरेदेसाठीही नागरिकांची वर्दळ वाढत आहे.
परिणामी वाहनंचे प्रमाणही वाढत असल्याने हवेतील प्रदूषकांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळेच लॉकडाऊन काळात 50 ते 80 प्रतिक्युबिक घनमीटर या प्रमाणात असलेली प्रदूषके आता 90 प्रतिक्युबिक घनमीटर इतकी वाढली आहे. त्यामुळेच हवेची गुणवत्ता ही उत्तमवरून “समाधानकारक’ पातळीवर पोहचली असल्याचे निरीक्षण सफर- सफर-आयआयटीएम या संस्थेने नोंदविले आहे.