सातारा – जिल्हा परिषदेला मिळणारा सर्व प्रकारचा निधी मुदतीत खर्च व्हावा यासाठी जिल्हा परिषदेने पावले उचलली आहेत. मंजूर निधी मार्च अखेर खर्च करण्याची जबाबदारी खातेप्रमुखांवर असून मुदतीत निधी खर्च न झाल्यास खातेप्रमुखांना कारवाइला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाची लगबळ वाढली आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना जिल्हा नियोजन समिती व शासनाकडून येणारा निधी खर्च करण्यासाठी मुदत दिलेली असते. साधारणत: मार्च अखेर निधी खर्च करावा अशा सुचना प्रशासनाकडून दिलेल्या असतात. मुदतीत निधी खर्च झाला नाही तर निधी अखर्चित राहून तो माघारी जाण्याचा धोका असतो. त्यामुळे निधी अखर्चित राहू नये यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून बैठकांचा सपाटा लावला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी याबाबत आढावा घेवून निधी मुदतीत खर्च करण्याबाबत खातेप्रमुखांना सुचना दिल्या आहेत.
लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहित धरुन निधी मंजूर असलेल्या कामांची टेंडर प्रक्रिया करुन वर्क ऑर्डर देण्यात येत आहेत. बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही कामावर हजर राहून ही प्रक्रिया राबवत आहेत. कोणत्याच विभागाचा निधी अखर्चित राहू नये यासाठी खातेप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
बांधकाम विभाग (उत्तर), बांधकाम विभाग (दक्षिण), प्राथमिक शिक्षण, लघु पाटबंधारे, आरोग्य, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पशुसंवर्धन, कृषी व पाणी व स्वच्छता विभागामध्ये सध्या विकासकामे व योजनांची गतीने अंमलबजावणी करुन निधी मुदतीत खर्च करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ज्ञानेश्वर खिलारी यांनी सर्व विभागप्रमुखांच्या बैठका घेवून सर्व प्रकारचा निधी मुदतीत खर्च करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व विभागप्रमुखांनी नियोजन केले आहे.
जिल्हा परिषदेला प्राप्त असलेला निधी मुदतीत खर्च करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. याबाबत खातेप्रमुखांना सुचना दिल्या असून निधी अखर्चित राहू नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मार्च अखेर निधी खर्च होण्यासाठी विभागप्रमुखांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
-ज्ञानेश्वर खिलारी (मुख्य कार्यकारी अधिकारी)