सातारा – ऐन पावसाळ्यात जिल्हा परिषदे कार्यालयात बुधवारी व गुरुवारी पाणीपुरवठा न झाल्याने विविध विभागांच्या कार्यालयांमध्ये पाण्याचा खडखडाट होता. अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेत येणाऱ्या अभ्यागतांचे पाण्यावाचून हाल झाले. दरम्यान, प्राधिकरणाची जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेची नवीन इमारत व जुनी इमारत यामध्ये विविध कार्यालये असून दररोज हजारो लिटर पाण्याचा वापर याठिकाणी होतो. एखाद्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळित झाला तरी मोठी अडचण निर्माण होते. बुधवारी आणि गुरुवारी अशा सलग दोन दिवस जिल्हा परिषदेला पाणीपुरवठा न झाल्याने सर्व कार्यालयांमध्ये पाण्याचा खडखडाट होता.
प्रत्येक मजल्यावर असलेल्या महिला व पुरुष स्वच्छतागृहातही पाणी नव्हते. पिण्याचे व वापराचे दोन्ही पाणी नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांचे पाण्यावाचून हाल झाले. कार्यालयात पाणी उपलब्ध नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने पाणी उपलब्ध करुन देण्याची गरज होती मात्र तसे झाले नाही.
दरम्यान, जिल्हा परिषदेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. ही पाइपलाइन फुटल्याने जिल्हा परिषदेस पाणीपुरवठा झाला नसून पाइपलाइन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळित होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
शासकीय विश्रामगृहातही पाणी नाही
जिल्हा परिषदेप्रमाणेच लगतच असलेल्या शासकीय विश्रामगृहावर पाण्याचा खडखडाट होता. विशेष म्हणजे सलग दोन दिवस पाणी नसतानाही पाणीपुरवठा जलद गतीने सुरु होण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. शासकीय विश्रामगृहात पाण्यावाचून नागरिकांचे हाल झाले. पाणीपुरवठा तात्काळ सुरळित करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.