सातारा – सातारा शहरात पार्किंगचा प्रश्न नेहमीचाच आहे. मुख्य बाजारपेठेत दुकानदारांसमोर गाड्या लावता येत नाहीत. दिवाळीला खरेदी करण्यासाठी सातारकर गेल्यानंतर त्यांच्या वाहनांना पार्किंगला जागा नसते. वाहतूक शाखा त्या वाहनांवर कारवाई करते. दिवाळीचा सण जवळ आलेला आहे त्यामुळे वाहतूक शाखेने सातारकरांना वाहतूक नियमांमध्ये थोडी सवलत द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्यावतीने निवेदनाद्वारे सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांच्याकडे केली आहे.
निवेदन देताना ठाकरे गटाचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, शहर संघटक प्रणव सावंत, उपशहर प्रमुख शिवाजीराव इंगवले, गणेश अहिवळे, अमोल गोसावी, सादिक बागवान, आझाद शेख, रवींद्र भणगे, सौ. मंजिरी सावंत, सौ. रुपाली लेंभे, सुमीत नाईक, सुनील भोसले, संतोष निगडकर, नितीन लकेरी, विनायक शिंदे, योगेश शेलार, ऋषिकेश साठे, सिद्धार्थ कांबळे. रजत नाईक आशतोष पारंगे. राजू नाईक, हेमंत उबाळे, सागर साळुंखे, सचिन शिंदे, राहुल जाधव, अनिल काशिद, संग्राम कांबळे, नागेश गवळी, सुनील यादव आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, महागाईच्या काळात जीएसटी आणि ऑनलाईन व्यापाऱ्याच्या विळख्यात अडकलेला व्यापारी तसेच ऑनलाईन पद्धतीने सर्वच स्तरातील जनतेची होणारी फसवणूक या सगळ्या बाबी विचारात घेता ही दिवाळी जनतेच्या आणि व्यापाऱ्यांसाठी चांगली जावो.
शहरी भागाबरोबरच शेजारील तालुक्यातून दिवाळीनिमित्ताने खरेदीसाठी येणारी शेतकरी व गावाकडील रोजंदारी करणारा वर्ग शहरात येतो. दरम्यानच्या काळात होणारी गर्दी. दुकानासमोर पार्किंगसाठी कमी असणारी जागा आणि पर्यायाने बऱ्याच लांबपर्यंत वाहन लावण्यासाठी होणारी धडपड या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण सामंजस्याची भूमिका घेवून दिवाळी काळामध्ये नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई न करण्याबाबत सूचना द्याव्यात. दिवाळीमध्ये सर्वसामान्य सातारकरांना अतिरिक्त भुर्दंड मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.