प्रशांत जाधव
महामार्गावर वाहनांच्या रांगा; रखडलेल्या वाहनधारकांसाठी धावली “खाकी’
राज्या-राज्यात सातारा पोलिसांचे नाव
महामार्गावर सुमारे दहा हजार ट्रक चालकांना सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी थांबवले आहे. यामध्ये देशातील बहुतेक राज्यातील ट्रक चालकांचा समावेश आहे. सातारा पोलिसांनी शिरवळ, खंडाळा, भुईंज, आनेवाडी, तासवडे, उंब्रज, तळबीड, कासेगाव फाटा याठिकाणी थांबलेल्या ट्रकचालकांची केलेली जेवणाची सोय अन् आपुलकीने केलेली विचारपूस यामुळे या ट्रक चालकांनाही सातारा जिल्हा पोलिसांचा हेवा वाटला. परिणामी सातारा पोलिसांचे नाव आता राज्याराज्यात घुमणार आहे हे नक्की.
सातारा – सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचप्रमाणे या पुराचा फटका पुणे बंगळुरू महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना खासकरून ट्रकचालकांना बसला. गेली तीन दिवस शिरवळपासून कराडपर्यंत वाहनांच्या लागलेल्या रांगामुळे वाहनधारकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. पाऊसपाण्यामुळे ना हॉटेल सुरू ना मदतीसाठी रस्त्यावर माणूस अशी परिस्थिती बनली होती. मात्र, या वाहनधारकांच्यासाठी सातारा जिल्ह्यातील “खाकी’ धावून आली आहे. पोलीस दलाच्या व सामाजिक संस्थांच्या मदतीने महामार्गावर अडकलेल्या वाहनधारकांना नाष्टा, जेवण पुरविण्यात आले आहे.
घटना कोणतीही असो सर्वात अगोदर मदतीसाठी पुढे असतात ते सातारा पोलीस. याची प्रचिती पुन्हा एकदा आली. जिल्ह्यातील पूर परस्थितीवर सतत लक्ष असलेल्या पोलिसांनी महामार्गावर पावसामुळे रखडलेल्या सर्व वाहन चालकांची केलेली खातिरदारी पाहून त्यांच्याही डोळ्याच्या कडा पाणावल्याचे पाहयला मिळाले. पोलिसांनी मदतीचे आवाहन तर केलेचे पण आलेल्या मदतीचे वाटप करताना वेळप्रसंगी महामार्गाच्या कडेला वाहन चालकांच्या बसवलेल्या पंगतीत सातारा पोलीस चक्क वाढपी झाले.
सातारा जिल्ह्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवल्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाची मगरमिठ्ठी जोरात बसली होती. परिणामी या दोन जिल्ह्यांतून जाणारा महामार्ग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या वाहनधारकांची कोणतीही प्रकारची हानी होऊ नये, म्हणून सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून वाहनधारकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले होते. कराडपासून पुढे कोल्हापूरकडे जाणारा महामार्ग बंद केला गेला. त्यामुळे शिरवळपासून सुरूवात झालेल्या वाहनांच्या रांगा कराडपर्यंत लागल्या होत्या. त्यातच सततच्या पावसामुळे महामार्गालगत असलेली हॉटेल्स बंद असल्याने वाहनधारकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता.
फारच छान मानवतेच उदाहरण