नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35 अ हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशवासियांसोबत संवाद साधला. तसेच कलम हटवल्यामुळे कोणतीही बिकट परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे असा विचार इथल्या जनतेने करू नये तसेच घाबरू जाऊ नये असे आवाहनही यावेळी पंतप्रधान मोदींनी केले. तसेच इथली परिस्थिती पुर्ववत झाल्यानंतर पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देऊ असे आश्वासनही यावेळी मोदींनी दिले.
काश्मीरच्या हितासाठीच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. देशाचा मुकुटमणी असलेल्या या प्रदेशाला पुन्हा एकदा शांत, सुरक्षित व समृद्ध होण्यासाठी हरसंभव मदत करणे हे प्रत्येक देशवासीयाचे कर्तव्य आहे, असे सांगून या खडतर काळात काश्मीरला एकजुटीने साथ देण्याचे आवाहन केले. दरम्यान,जम्मूला काही काळानंतर पुर्ण राज्याचा दर्जा देण्यात येणार असला तरी लडाख मात्र त्याहून वेगळे व केंद्रशासित प्रदेशच राहील, हेदेखील यावेळी त्यांनी स्पष्ट केले.