सातारा – करोनामुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाले असल्यामुळे सातारा नगरपालिकेची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. अशा परिस्थितीत पालिकेवर करोना प्रतिबंधासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाचा भारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नगराध्यक्षा माधवी कदम यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीची मागणी केली आहे. याबाबतचा प्रस्तावही पालिकेकडून सादर केला जाणार आहे.
सातारा पालिका गेल्या चार महिन्यांपासून करोना प्रतिबंधासाठी झटत आहे. चार महिन्यांमध्ये मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर, गमबूट, कटशूज, प्रतिबंधित क्षेत्र व तेथील उपाययोजना, धूर व औषध फवारणी, मृतदेहावरील अंत्यसंस्कार अशा अनेक बाबींसाठी जवळपास 28 ते 30 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. एवढे करूनही हा खर्च काही थांबलेला नाही. शहरातील प्रत्येक प्रतिबंधित क्षेत्राची जबाबदारी पालिकेच्या खांद्यावर आहे.
शिवाय उपनगरांसह पानमळेवाडी व खावली येथील क्वारंटाइन केंद्रांवरही पालिकेचे कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना दररोज पीपीई कीट व सुरक्षित साधने पुरविली जातात. यासाठी दररोज सुमारे 40 हजार रुपये खर्च येतो. याशिवाय एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल 23 हजार रुपये खर्च येतो.
प्रतिबंधित क्षेत्रात बॅरिकेटिंग करण्यासाठी येणारा खर्चही वेगळाच आहे. असा जवळपास 60 ते 70 हजार रुपये पालिकेला दररोजचा खर्च करावा लागत आहे. एकीकडे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाले असताना पालिकेचा खर्च काही कमी झालेला नाही. त्यामुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या प्रशासनाची खर्चाचा ताळमेळ लावताना प्रचंड कोंडी होत आहे.
नुकत्याच झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत नगराध्यक्षा माधवी कदम यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. अंत्यसंस्कार व खावली, पानमळेवाडी येथील कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या खर्चासाठी निधी तरतूद केल्यास पालिकेवरील मोठा भार कमी होईल, अशी अपेक्षा नगराध्यक्षांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही निधी देण्यास सकारात्मकता दर्शविली असून, याबाबतचा प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला केल्या आहेत. त्यादृष्टीने हा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा माधवी कदम यांनी दिली.