सातारा – जुलै महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने शासनाने जिल्ह्याचा आढावा घेऊन तातडीने दुष्काळ जाहीर करावा, तसेच पिके वाया गेल्याने शेतीचे पीक कर्ज शंभर टक्के माफ करावे, 2019-20 ची ऊस बिलाची थकीत रक्कम व्याजासह एकरकमी द्यावी, अशा मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.
या मागण्यांची आठ दिवसांत अंमलबजावणी न झाल्यास सहा ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारी सदस्य अर्जुनराव साळुंखे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी धनंजय महामुलकर, अनिल पवार, दादासाहेब यादव, तानाजी देशमुख तसेच रमेश पिसाळ, नितीन यादव, बापूराव साळुंखे, प्रमोद जगदाळे, संजय जाधव, संजय कांबळे, विजय चव्हाण, रामचंद्र मोरे, दत्ता पाटील, महादेव डोंगरे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की, हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन पेरणी व लागवड केली. पण जिल्ह्यात पाऊसच न पडल्याने पिके वाया जाण्याची भीती आहे. ऑगस्ट महिना उजाडला तरी पाऊस नसल्याने जिल्ह्याचा तातडीने आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करावा.
शेती उत्पादनाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.
शेतकरी किमान तरला पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे व घरगुती वीजबिल पूर्णपणे माफ करावे. शेती उत्पन्न निघेल या आशेने कर्ज काढून केलेला खर्च पावसाअभावी वाया गेला आहे. त्यामुळे पीक कर्ज शंभर टक्के माफ करावे. शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा प्रवेश फी माफ करावी. तसेच दुष्काळ जाहीर करून मिळणाऱ्या सोयी सवलती लागू कराव्यात. शेतकरी व शेतमजूरांना वैद्यकीय कारणास्तव होणार संपूर्ण खर्च माफ करावा.
मोफत सवलती मिळाव्यात. तसेच 2019-20 मधील ऊस गळीत हंगामातील ऊस बिलाची थकित रक्कम व्याजासह एकरकमी तात्काळ मिळावी. ज्या कारखान्यांनी नियमाप्रमाणे देय रक्कम दिली नाही, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्या येत्या आठ दिवसांत मान्य न झाल्यास सहा ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन तसेच ऊस बिलासाठी कारखान्याचे अध्यक्ष व संचालक यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.