सातारा – राष्ट्रपिता महात्मा गांधी बहु सांस्कृतिकता जपणारे वैश्विक नेते होते. त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी भारतातील बहु संस्कृतिकता, विविधता टिकवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते यावर्षीचा संस्कृती क्षेत्राचा सातारा जीवनगौरव पुरस्काराने पुणे येथील ज्येष्ठ नाटककार दिग्दर्शक, कादंबरीकार मकरंद साठे यांना व कलाक्षेत्राचा कृष्णामाई जीवनगौरव पुरस्काराने नाशिक येथील ज्येष्ठ चित्रकार, कवी ,लेखक धनंजय गोवर्धने यांना प्रत्येकी ३५हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, शाल व कंदी पेढे देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ‘भारतीय राज्यघटना व बहुसांस्कृतिकता’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जेष्ठ कवी प्रमोद कोपर्डे होते. विचार मंचावर प्रतिष्ठानचे विश्वस्त ज्योत्स्ना पाटील-शिंदे व कवी वसंत शिंदे होते.
या प्रसंगी प्रमोद कोपर्डे यांच्या ‘निरंतर अधांतर’ या नवीन कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे व जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. पाटील म्हणाले, भारतीय संविधान हा मानवता व समतेचा पुरस्कार करणारा राष्ट्रीय ग्रंथ आहे.बहुसांस्कृतिकता हा तिचा मुलाधार व आविष्कार आहे. तिच्यावर घाला घालण्याचे काम सध्या होत आहे. संविधानाच्या अमृत महोत्सव काळात या अनुषंगाने प्रबोधन करण्यासाठी आपण ७५ व्याख्याने देण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
मकरंद साठे म्हणाले, संस्कृतीकडे संकुचितपणे पाहिले जाते. खरे तर ती अन्नपाण्यापेक्षाही जास्त महत्त्वाची असते. बहुसांस्कृतिकता धोक्यात आणणारीअत्यंत भयावह अशी परिस्थिती देशभर आणि जगभर निर्माण झालेली आहे. साहित्य व कला क्रांती घडवण्यास मदत करते. कलावंतांनी देशातील बहुसांस्कृतिकता लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
धनंजय गोवर्धने म्हणाले , साहित्यिक कलावंतांनी सत्याचा शोध घ्यावा.हेच त्यांचे मूलभूत कार्य असते. कोपर्डे पुरस्कार बळ व मनाला उभारी देणारे असल्याची भावना यावेळी दोन्ही पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात प्रमोद कोपर्डे म्हणाले, साहित्य हे संस्कृतीचे वाहक आहे. लेखक कलावंतांनी संस्कृतीचा प्रवाह गतिमान करण्याचे काम केले पाहिजे. महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा या तत्त्वाशिवाय समाजाला भवितव्य नाही. या समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवर श्रोते उपस्थित होते .चित्रा भिसे यांनी सूत्रसंचालन केले.