पाचगणी – जिल्ह्यातील वातावरणात पाच दिवसांपासून शीतलहर असून पारा खालावला आहे. सातारा शहरात किमान तापमान १२ अंशापर्यंत आले आहे. तर महाबळेश्वरही गारठले असून हुडहुडी वाढली आहे. त्यामुळे सध्या नागरिकांना कडाक्याच्या थंडीशी सामना करावा लागत असून जनजीवनावरही परिणाम होऊ लागला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबरपासून थंडीला सुरूवात होते. मात्र, यावर्षी थंडी उशिरा सुरू झाली. नोव्हेंबर महिना तसा थंडीविनाच गेला. कायम किमान तापमान २० अंशापर्यंत राहिले. डिसेंबरच्या मध्यानंतर थंडी जाणवू लागली. त्यावेळी पारा १३ अंशापर्यंत खाली आला होता. महाबळेश्वरलाही १२ अंशापर्यंत तापमान घसरले होते. पण, दोन दिवसांतच पारा वाढत गेला. त्यामुळे थंडीही गायब झाली होती. परिणामी यंदा कडाक्याची थंडी पडणार नाही असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, देशाच्या उत्तर भागात सध्या बर्फ पडत आहे. तसेच जम्मू, दिल्ली, पंजाबात पारा घसरला आहे. तसाच प्रकार सातारा जिल्ह्यातही सुरू झाला आहे. वातावरणात शीतलहर असल्याने अंगातून थंडी जाईना अशी स्थिती आहे. त्यामुळे एक प्रकारे थंडीची लाटच आल्याचे चित्र आहे.
सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान १५ अंशाखाली आहे. गुरुवारी १२ अंश पारा नोंद झाला. महाबळेश्वचा पाराही ११.९ अंश नोंद झाला. सकाळी चालणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. तर शेतकरी सकाळी दहानंतरच शेतातील कामे उरकत आहेत. शहरातील बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे. थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरला तर गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीशी नागरिक तसेच पर्यटकांना सामना करावा लागत आहे. आणखी काही दिवस कडाक्याची थंडी राहील, असा अंदाज आहे.
सातारा शहरात किमान तापमान..
दि. १ जानेवारी १३.७, २ जानेवारी १४.१, ३ जानेवारी १५.४, ४ जानेवारी १६.५, ५ जानेवारी १७.२. ६ जानेवारी १७.५, ७ जानेवारी १७.२. दि. ८ जानेवारी १६.६, ९ जानेवारी २०.२, १० जानेवारी १८.१, दि. ११ जानेवारी १७.४, १२ जानेवारी १६.१, १३ जानेवारी १५.५, १४ जानेवारी १५.८, दि. १५ जानेवारी १४.५, १६ जानेवारी १२.४.