पुणे – राज्याची प्रत्यक्ष सिंचन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सिंचन प्रकल्प कमी वेळेत पूर्ण केले पाहिजेत. मुख्य सिंचन प्रकल्पाचे काम सुरू असतानाच, प्रकल्पात साठविले जाणारे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असणारे कालवे, वितरिकांची कामे केली पाहिजेत. जुन्या कालव्यांच्या दुरुस्तीची कामे करून पाणी गळती थांबवावी. नवीन प्रकल्पांमध्ये केवळ नलिकेद्वारे पाणीपुरवठ्याच्या कामांचा समावेश करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
महसूल, नियोजन, सामान्य प्रशासन, जलसंपदा, खारभूमी, लाभक्षेत्र विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, पशुसंवर्धन, दुग्धविकास अशा १० विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ आखणीसंदर्भात राज्यस्तरीय आढावा पवार यांनी घेतला. त्यावेळी पवार यांनी या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्याच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने राज्याबाहेर, परदेशात निर्यात वाढली पाहिजे. राज्यासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारात दूध, अंडी, मासे, मांस, लोकर या उत्पादनांना मोठी मागणी आहे. मागणीनुसार दर्जेदार उत्पादनांचा पुरवठा करून नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी पुढील १५ वर्षांचा पशुधन विकास बृहद आराखडा तयार करा. त्यासाठी पशुधनाची उत्पादकता वाढविणे आवश्यक असून त्यादृष्टीने नवनवीन संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. पशुधनावरील खर्च कमी करतानाच त्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी संतुलित पशुखाद्य, पशुरोग निदान, लसीकरणावर भर देण्यात यावा, असे आदेशही पवार यांनी यावेळी दिले.
वायू, जलप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करा
नदी, नाल्यांचे वाढलेले प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. नद्यांमधील पाणी स्वच्छ करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. प्रगत तंत्रज्ञानाच्या उपयोगातून कारखाना, औद्योगिक क्षेत्रातील पाण्याचा पुनर्वापर वाढीसाठी प्रयत्न करा. पर्यावरण संतुलनासाठी सर्व निकषांची पूर्तता कटाक्षाने करावी.
प्रक्रिया केलेले पाणीच नदीत सोडले जाईल, यासाठी ठोस कारवाई करा. पाणी, हवा यांचे प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा. भविष्यातील वाढती लोकसंख्या, वाहनांचा, पाण्याचा, जमिनीचा वापर लक्षात घेऊन हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.